बॉलिवूडच्या भाईजानचा ‘रेस ३’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजल्यानंतर तो आता त्याच्या आगामी प्रोजेक्टसकडे वळला आहे. सध्या सलमान छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘दस का दम’ हा कार्यक्रम करत असून यात तो सुत्रसंचालकाच्या भूमिकेमध्ये झळकून येत आहे. या शोमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना सलमान वेगवेगळे प्रश्न विचारत असून त्यांना विचार करण्यास भाग पाडत असल्याचं पाहण्यात येतं. विशेष म्हणजे या प्रश्नमंजुषेच्या खेळात अनेक विनोददेखील घडत असतात तर काहीवेळी स्पर्धकांच्या किंवा सलमानच्या तोंडून त्यांच्या जीवनातील गुपितांचा खुलासा होताना दिसून येतं. सध्या नुकत्याच झालेल्या एका भागामध्ये सलमानने प्रेमाविषयीचे त्याचे विचार स्पष्ट मांडले आहेत.

‘दस का दम’ या शोला टीआरपी कमी मिळत असल्यामुळे शो मेकर्सनी या शोची वेळ कमी केल्याचं दिसून येत आहे. ‘दस का दम’ या शोचे आतापर्यंत बरेच भाग झाले असून नुकत्याच एका नव्या भागाचं चित्रिकरण करण्यात आला होतं. चित्रित करण्यात आलेल्या या भागामध्ये सलमानने स्पर्धक महिलेला प्रेमाविषयी प्रश्न विचारत प्रेमाप्रतीचे त्याचे मतही व्यक्ती करताना दिसून आले.

‘खरं प्रेम केवळ एकदाच होतं असं किती टक्के भारतीयांचं मत आहे’, असा प्रश्न सलमानने स्पर्धक महिलेला विचारला. त्यावर महिलेचं उत्तर येण्यापूर्वीच सलमानने त्याचा प्रेमावर विश्वास नसल्याचं सांगितलं. इतकंच नाही तर त्याने पुढे प्रेम ही संकल्पनाच खोटी आहे असं म्हटलं.सलमानच्या या उत्तरामुळे प्रेक्षकांमध्ये दोन मिनिटांसाठी शांतता पसरली होती.  ‘माझा प्रेमावर अजिबात विश्वास नाही, प्रेम ही संकल्पनाच खोटी आहे’, असं सलमान यावेळी म्हणाला होता.

दरम्यान, सलमानने असं उत्तर का दिलं हे साऱ्यांनाच ठाऊक आहे. अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि सलमान यांच्या नात्यामध्ये दुरावा आल्यानंतर सलमानचं नाव अनेक अभिनेत्रींबरोबर जोडलं गेलं होतं.मात्र ऐश्वर्याचं नाव घेतल्यावर सलमान अजूनही भावूक होत असल्याचं पाहायला मिळतं. करिअरमध्ये यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या सलमानच्या ‘दस का दम’ या शोचं हे तिसरं पर्व असून पहिल्या दोन पर्वाचं सूत्रसंचालनही सलमानने केलं होतं.