‘शुभ मंगल सावधान’ हा मंत्र उच्चारताच त्या १२ वर्षाच्या मुलाने भर लग्नातून धूम ठोकली. रानोमाळ भटकला. वैराग्य धारण केले आणि त्याला जीवनाचे सार सापडले. हेच जीवनाचे सार आपल्याला ‘दासबोध’ या ग्रंथातून आदर्श जीवन जगण्याचे धडे देतो. हा तरुण म्हणजे महाराष्ट्रातील ‘संत सांप्रदायातील एक संत समर्थ रामदास स्वामी’. रामाचे परमभक्त म्हणून संपूर्ण जग ज्यांना ओळखते ते म्हणदे समर्थ रामदास स्वामी. रामदास स्वामी म्हटले की आपल्याला मनाचे श्लोक इतकंच आठवतं पण त्याचं कार्य त्याहून अधिक आहे. समर्थ रामदास स्वामींनी तरुणांमध्ये प्रखर राष्ट्रभक्ती निर्माण केली. तरुणांनी बालोपासना करावी यासाठी कुस्तीचे आखाडे गावोगावी उभारले. सूर्यनमस्काराचे महत्त्व आपल्याला आज कळतंय त्याचे बीज समर्थांनी पेरले. मारुती म्हणजे शक्तीची देवता. मारुतीपासून तरुणांनी प्रेरणा घ्यावी यासाठी त्यांनी प्रत्येक गावात मारुतीची स्थापना केली, मठ उभारले. महाराष्ट्रात चैतन्य निर्माण केलं. त्यांनी आजन्म ब्रम्हचारी राहण्याची शपथ घेतली त्याप्रमाणे ते आजन्म संन्यस्त राहिले. पहिल्यांदाच अशा या तेजस्वी आणि ओजस्वी संताची आजच्या पिढीला नव्याने ओळख करुन देण्यासाठी ‘रघुवीर’ हा सिनेमा लवकरच पडद्यावर येत आहे. अभिराम भडकमकरने चित्रपटाची कथा पटकथा लिहिली असून मंदार चोळकरने गीते लिहीली आहेत. तसेच अजित परबने सिनेमाला संगीत दिले आहे. निर्माता अभिनव पाठकची समर्थ क्रियेशन ही संस्था या चित्रपटाची निर्मिती करत असून निलेश कुंजीर चित्रपटाचं दिग्दर्शक करत आहेत. या चित्रपटाचे चित्रिकरण नुकतेच पूर्ण झाले असून समर्थांची भूमिका कोण साकारतंय हे मात्र सध्या गुलदस्त्यात ठेवण्यात आलंय. सिनेसृष्टीतल्या अनेक नामवंत कलाकारांच्या अभिनयाने हा चित्रपट रंगला आहेस असे दिग्दर्शक निलेश म्हणाले. 'रघुवीर' हा संत समर्थ रामदास स्वामी यांचा चरित्रपट निश्चितच आजच्या तरुणांना प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही.