क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचे लग्न सध्या ट्रेडिंग विषय आहे. कोणताही कार्यक्रम असला तरी ‘विरुष्का’च्या लग्नाची चर्चा तेथे झालीच पाहिजे. एरवी मोठमोठ्याने ओरडून, जाहिरात करीत आपला प्रत्येक सोहळा वदवून घेणारे बॉलिवूड कलाकार आणि सेलिब्रेटी असं गुपचूप लग्न करतात म्हटल्यावर थोडं नवल वाटणारच. त्यामुळे विरुष्काने असं गुपचूप लग्न का केलं असावं, याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र, टेनिसपटू सानिया मिर्झाने त्या दोघांनी अशा पद्धतीने लग्न करण्यामागचे नेमके कारण उलगडले. प्रसारमाध्यमांकडून सेलिब्रिटींच्या लग्नाविषयी होणारा गवगवा टाळण्यासाठी विरुष्काने इटलीला जाऊन लग्न केल्याचे सानियाचे म्हणणे आहे.

वाचा : विरुष्काने पाहुण्यांना दिले ‘हे’ रिटर्न गिफ्ट

‘सेलिब्रिटींच्या लग्नामध्ये बऱ्याचदा बाहेरच्या गोष्टींमुळे गोंधळ होतात. भारतात लग्न केल्यावर प्रसारमाध्यमं बराच घोळ घालणार याची विराट – अनुष्काला पुरेपूर जाणीव होती. त्यामुळेच त्यांनी लग्नासाठी इटलीची निवड केली. मी या दोघांनाही जवळून ओळखते. त्यांची जोडी अप्रतिम तर आहेच पण ते वैयक्तिकरित्याही तितकेच प्रभावी आहेत. भावी आयुष्यासाठी माझ्याकडून त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा’, असे सानिया म्हणाली. येत्या २६ डिसेंबरला नवी दिल्लीत विरुष्काने रिसेप्शन ठेवले आहे. त्याला तू जाणार का, असा सवालही सानियाला करण्यात आला. त्यावर ती म्हणाली की, ‘मी नक्की सांगू शकत नाही. कारण, त्यावेळी मी भारतात नसणार. २१ डिसेंबरला मी दुबईला जाणार आहे.’

वाचा : शाहरुखच्या गाण्यावर अब्राम डान्स करतो तेव्हा..

सुरुवातीला शाम्पूच्या जाहिरातीच्या निमित्ताने एकत्र आलेले विराट आणि अनुष्का अलीकडे पुन्हा कपड्यांच्या जाहिरातीमध्ये एकत्र दिसल्यानंतर त्यांच्या जोडीची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती. बॉलिवूड आणि क्रिकेटची गाठ नवीन नसली तरी अनेकदा यशस्वी कहाण्यांपेक्षा तुटलेल्या नात्यांबाबतच जास्त चर्चा केली जाते. त्यामुळे विरुष्काचे सूर कायमचे जुळणार की लग्नाआधीच काडीमोड होणार याची अनेकांना उत्सुकता होती. गेल्या सोमवारी इटलीतल्या टस्कनी प्रांतातील बोर्गो फिनोशितो या रिसॉर्टमध्ये त्यावर शिक्कामोर्तब झालं. लग्नानंतर विराट आणि अनुष्कानेही एकाच वेळी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून विवाहाची घोषणा केली आणि आपल्या चाहत्यांना ट्विटमधून धन्यवाद दिले.