संजय लीला भन्साळी आणि सलमान खान ही जोडी कित्येक वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर परतत आहे. ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटानंतर सलमान आणि भन्साळींनी एकत्र काम केलंच नाही. इतक्या वर्षांत एकत्र काम का केलं नाही याचं उत्तर पहिल्यांदाच भन्साळींनी दिलं आहे.

‘सलमान आणि माझ्यात अनेक वाद होते पण हे वाद मिटले आहेत. त्याला माझे चित्रपट, त्यातील गाणी आवडायची पण त्यानं कधीही माझ्याजवळ स्तुती केली नाही तो नेहमीच इतरांकडे माझं कौतुक करायचा. मला त्याच्यासोबत काम करायचं होतं. ईन्शाल्लाची स्क्रिप्ट वाचताच त्यांनं मला होकार दिला. भूतकाळात सलमानसोबत माझे वाद असले तरी मी खात्रीपूर्वक सांगेन की तो एक चांगला व्यक्ती आहे आणि शेवटपर्यंत मैत्री निभावतो.’ अशी कबुली भन्साळी यांनी दिली आहे.

‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटात शेवटचं सलमाननं भन्साळींसोबत काम केलं होतं. नुकतीच भन्साळी यांनी ‘ईन्शाल्ला’या चित्रपटाची घोषणा केली . या चित्रपटाच्या निमित्तानं भन्साळी आणि सलमान तब्बल १९ वर्षांनी एकत्र काम करत आहेत. या चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून आलिया भट्टची निवड करण्यात आली आहे. आलिया आणि सलमान ही जोडी पहिल्यांदाच एकत्र पाहायला मिळणार आहे.