‘संजू’ या चित्रपटामुळे यशाच्या शिखरावर पोहोचलेला अभिनेता रणबीर कपूर सध्ये एका अडचणीत सापडला आहे. पुण्यातील त्याच्या घरात असणाऱ्या भाडेकरुने रणबीरवर काही आरोप करत त्याच्याविरोधात खटला दाखल केला आहे.

‘बॉलिवूड लाइफ’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार रणबीरवर त्याच्या घरातील भाडेकरुने भाडेतत्वाच्या करारातील नियम व अटी न पाळल्याचे आरोप केले आहेत. पुण्यातील त्याच्या कल्याण नगर येथे असणाऱ्या ट्रम्प टॉवर्स येथे असणारं रणबीरचं घर भाड्याने दिलं असून, ऑक्टोबर २०१७ पासून तेथे शीतल सूर्यवंशी राहात आहेत. पण, करारात नमूद केलेल्या अंतिम तारखेपूर्वीच संपूर्ण कुटुंबासह त्यांना घर सोडण्यास सांगण्यात आल्याचा आरोप त्यांनी रणबीरवर केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास ६ हजार चौरसफूटांच्या या घरासाठी त्यांनी रणबीरच्या टीमसोबत २४ महिन्यांचा करार केला होता. पण, या घरात राहण्यास आल्यापासूनच अकरा महिन्यांच्या आतच त्यांना घर सोडून जाण्याची नोटीस पाठवण्यात आली. पुढच्या एका महिन्यात त्यांनी हे घर सोडावं, अशी मागणी त्यात करण्यात आली होती. ज्यामुळे आता त्यांचं संपूर्ण कुटुंब अडचणीत आल्याचं कळत आहे.

Bigg Boss Marathi : मेघा, पुष्कर की सई; कोण ठरणार विजेता?

करारात नमूद केल्याप्रमाणे या घराचं भाडं म्हणून पहिल्या वर्षी ४ लाख रुपये आणि दुसऱ्या वर्षी ४ लाख २० हजार रुपये इतकी रक्कम देण्याचं कबुल करण्यात आलं होतं. पण, आता अकरा महन्यांच्या आतच त्यांच्या कुटुंबाला घर सोडण्यास सांगण्यात आल्यामुळे रणबीरने आपल्याला ५० लाख चाळीस हजार रुपये द्यावेत अशी मागणी सूर्यवंशी यांनी केली आहे. त्याशिवाय कुटुंबाला सामना कराव्या लागलेल्या अडचणींसाठी १ लाख ४ हजार रुपयांची अतिरिक्त मागणीही त्यांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, आपल्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या या तक्रारीनंतर रणबीरने यात आपली भूमिका मांडली आहे. त्याने आपल्यावर करण्यात आलेल्या सर्व आरोपांचं खंडन केलं आहे. भाडेकरुशी फक्त एकाच वर्षाचा करार करण्यात आल्याचंही त्याच्या बाजूने स्पष्ट करण्यात आलं. संबंधित भाडेकरुंनी स्वत:च्या इच्छेने हे घर सोडलं असून, तीन महिन्यांचं भाडंही त्यांनी थकवलं होतं. जे त्यांच्या डिपॉझिट रकमेतून कापण्यात आलं आहे. या सर्व प्रकरणाची सुनावणी आता २८ ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे.