दिग्दर्शक सत्यजीत भटकळ यांनी आमिर खान आणि किरण राव यांच्या मदतीने ‘पानी फाऊंडेशन’ची सुरुवात केली तेव्हा त्याचा इतक्या वेगाने विस्तार होईल, याची कल्पनाच त्यांना नव्हती असं नाही. मात्र सामाजिक कार्यासाठी आमिर आणि किरण रावसारखे दोन मोठे चेहरे जेव्हा प्रत्यक्ष काम करताना दिसतात तेव्हा लोकांना सहजच प्रेरणा मिळते, असं ते म्हणतात. या उपक्रमाच्या तिसऱ्या वर्षांत जोडल्या जाणाऱ्या गावांची संख्या मोठी असेल हे स्पष्ट करतानाच पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्राला एकत्र आणणं हेच ध्येय असल्याचंही भटकळ यांनी सांगितलं. ‘आमिर खान हा मोठा सेलिबट्री. तो शहरी भागात राहिला आहे त्याला गावातली पाण्याची समस्या काय माहिती, असा विचार गावक ऱ्यांनी कधीच केला नाही. तो इतका मोठा असूनही हे काम करू शकतो, त्याच्याबरोबर इतके गावकरी काम करू शकतात, मग आपण का नाही, अशी विचारसाखळी निर्माण झाली. आमिरने या व्यासपीठावर येण्याचा हा सगळ्यात मोठा फायदा होता, आहे. आज आम्ही एका गावात जाऊन श्रमदान करतो तेव्हा दुसऱ्या गावालाही प्रेरणा मिळते. असं एकेक करत गावं जोडण्याचा हा आमचा प्रयत्न यशस्वी ठरतो आहे’, असं भटकळ म्हणतात. सध्या ‘झी मराठी’वर ‘तूफान आलंया’ या कार्यक्रमाची जाहिरात मराठीतून करणारा आमिर दिसतो आहे. ग्रामीण भागात अजूनही व्हॉट्सअॅप वगळता शहरांत सर्रास वापरली जाणारी अन्य समाजमाध्यमे नाहीत. मात्र टेलीव्हिजन हे तिथलं घराघरात पोहोचलेलं माध्यम आहे. म्हणून ‘तुफान आलंया’सारख्या कार्यक्रमातून गावकरी कशा पद्धतीने श्रमदान करतायेत, आपली पाण्याची गरज भागवतायेत हे प्रत्यक्ष लोकांना पाहायला मिळेल, असं त्यांनी स्पष्ट केलं. सध्या पानी फाऊंडेशनचं काम समाजमाध्यमांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरही पोहोचलं आहे तिथूनही लोकांची मदतीसाठी मागणी येते आहे. मात्र आम्हाला महाराष्ट्र एकजूट करायचा आहे त्यामुळे या कार्यासाठी मदतही इथेच उभी राहिली पाहिजे, यावर आपला भर असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी फेसबुक किंवा समाजमाध्यमांवर येणाऱ्या अगदी छोटय़ातल्या छोटय़ा सूचनांचीही दखल घेऊन आम्ही त्यावर काम करतो आहोत, सतत अभ्यास, नवनव्या पर्यायांचा शोध यांच्या मदतीने हा उपक्रम उत्कृष्ट होण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे सत्यजीत भटकळ यांनी सांगितले. ३१ मार्चपासून झी मराठीवर ‘तुफान आलंया’ या कार्यक्रमातून परत काहीतरी नवीन करायला आम्ही सज्ज आहोत. त्यासाठी आमिरही लवकरच सोशल मीडियातर्फे लाइव्ह जाणार आहे. गेल्या वर्षी बराचसा कार्यक्रम हा स्टुडिओत शूट झाला होता. यावर्षी मात्र हा कार्यक्रम आऊ टडोअर, ऑन ग्राऊंड स्वरूपाचा असेल, अशी माहिती देत ‘सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा २०१८’ या उपक्रमात प्रत्येकाने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.