सुपरस्टार रजनीकांत यांच्या पत्नी लता रजनीकांतद्वारे चालवण्यात येणारी शाळा बंद झाली आहे. शाळा सुरु असणाऱ्या इमारतीचे भाडे थकवल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. रजनीकांत यांच्या पत्नी चालवत असलेली शाळा बंद करण्यात आल्यानंतर तेथे शिकणाऱ्या जवळपास ४०० विद्यार्थ्यांना तुर्तास दुसऱ्या शाळेत पाठवण्यात आले आहे. या सर्व प्रकरणामध्ये भाडे थकवल्यामुळे शाळा बंद करण्याचे काहीच कारण नसल्याचे सांगण्यात येत असून, इमारतीचा मूळ मालक चुकीच्या पद्धतीने भाडेवाढ करत असल्याचा मुद्दा शाळेशी संबंधित व्यक्तींकडून मांडण्यात आला आहे. लता रजनीकांत चालवत असलेल्या शाळेशी संलग्न व्यक्तींनी या सर्व प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली. 'इमारतीच्या मालकाने कायदा हातात घेतला आहे. मुख्य म्हणजे कोणतीही पूर्वसुचना न देता हा कट रचत त्यांनी शाळेची आणि आमची प्रतिष्ठा मलिन करण्याचा प्रयत्न केला आहे', असे मत पदाधिकाऱ्यांनी मांडले. शाळेच्या पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणी ते इमारतीच्या मालकाविरोधात अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार असून, शाळेविषयी आपत्तीजनक वक्तव्य करुन माध्यमांना चुकीची माहिती देण्याची तक्रार दाखल करणार आहेत. वाचा : पूनम महाजन- रजनीकांतच्या भेटीवरुन राजकीय खलबत १९९६ मध्ये लता रजनीकांत यांनी ही शाळा सुरु केली होती. पण, गेल्या दोन वर्षांपासून इमारतीच्या मालकाकडून वारंवार चुकिच्या पद्धतीने भाडेवाढीची मागणी करण्यात येत असल्यामुळे शाळेच्या कार्यकारिणीसमोर नवा पेच उभा राहिला आहे. रजनीकांत यांच्या राजकीय प्रवेशाविषयीच्या चर्चांना उधाण आलेलं असतानाच अचानक हा मुद्दा माध्यमांपर्यंत पोहोचला असून एक प्रकारे पैसे उकळण्यासाठी स्वार्थीपणे हा कट रचण्यात आल्याचंही म्हटलं जात आहे.