१९९५ साली प्रदर्शित झालेला ‘करण-अर्जुन’ हा चित्रपट आजही दमदार संवादांसाठी आणि दोन भावांमधील दर्शविण्यात आलेल्या प्रेमासाठी ओळखला जातो. पुनर्जन्मावर आधारित या चित्रपटामध्ये अभिनेता शाहरुख खान आणि सलमान खान ही जोडी झळकली होती. मात्र या चित्रपटानंतर काही कारणास्तव या दोघांमध्ये फूट पडली आणि त्यांच्या वाटा वेगळ्या झाल्या. परंतु अनेक वर्ष लोटल्यानंतर ही जोडी पुन्हा एकदा एकत्र येणार आहे.

काही दिवसापूर्वी सलमान-शाहरुखची ही जोडी बिग बॉसच्या मंचावर एकत्र झळकली होती. त्यानंतर काही चित्रपटांच्यानिमित्ताने त्यांनी एकमेकांच्या चित्रपटातही कॅमिओ केला. परंतु आता ही जोडी केवळ कॅमिओसाठी किंवा रिअॅलिटी शोसाठी एकत्र येणार नसून संजय लीला भन्साळींच्या चित्रपटात एकत्र झळकणार आहे.

संजय लीला भन्साळी एका चित्रपटाची निर्मिती करत असून या चित्रपटामध्ये शाहरुख -सलमानने एकत्र झळकावं अशी त्यांची इच्छा आहे. सध्या या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम सुरु असून हे काम पूर्ण झाल्यानंतर ते सलमान-शाहरुखची भेट घेणार असल्याचं ‘डेक्कन क्रॉनिकल’ने म्हटलं आहे.

दरम्यान, भन्साळी यांचा हा आगामी चित्रपट दोन मित्रांच्या मैत्रीवर आधारित असून या साठी सलमान-शाहरुख योग्य असल्याचं त्यांचं मत आहे. विशेष म्हणजे या दोन्ही अभिनेत्यांसोबत भन्साळी यांचे चांगले संबंध असल्यामुळे या चित्रपटासाठी दोघांकडूनही होकार येण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.