निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेता करण जोहरसाठी हे वर्ष खूपच खास आहे कारण, बॉलिवूडमधल्या त्याच्या कारकिर्दीची २० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे गेल्या वीस वर्षांत ‘प्रेमाचा त्रिकोण’ याच संकल्पेनेवर आधारित जास्तीत जास्त हिट चित्रपट देणाऱ्या करणनं आता नव्यानं कंबर कसली आहे. आतापासूनच पूर्वीपेक्षा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करणनं सुरू केला, विशेष म्हणजे यासाठी करणला शाहरुखची साथ हवीय. शाहारुख- करणच्या जोडीनं बॉलिवूडमध्ये राज्य केलंय हे वेगळं सांगायला नको, त्यामुळे आता शाहरुखलाच सोबत घेऊन या इण्डस्ट्रीत वेगळं काहीतरी करण्याचा त्याचा विचार आहे.

त्यामुळे करणच्या आगामी बिग बजेट सिनेमात शाहरूखचा वाटा महत्त्वाचा असणार आहे. ‘हिदुस्थान टाइम्स’ला दिलेल्या एका मुलाखतीत करणनं शाहरुखच आपल्या पुढच्या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार असल्याचं एकप्रकारे सुचवलं आहे. ‘जेव्हा मी शाहरुखसोबत काम करतो तेव्हा तेव्हा मी यशस्वी झालोय, त्याचं आणि माझं समीकरणच वेगळं आहे. आता पुन्हा एकदा त्याच्यासोबत सिनेमात काम करायला मी उत्सुक आहे’ असं करणनं सांगितलं.

‘माझ्या यशस्वी करिअरमध्ये शाहरुखचा वाटा मोलाचा आहे. हे फक्त करिअरच्या बाबतीच नाही, तर आयुष्याच्या बाबतीतही तसंच आहे. शाहरुख माझ्या आयुष्याचाही महत्त्वाचा भाग आहे. शाहरुख, त्याची पत्नी गौरी त्याची मुलं यासगळ्यांनी माझं आयुष्य व्यापलं आहे. ही मैत्री नाही तर आमचं नातं मैत्रीपलीकडचं आहे. आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर शाहरुखनं मला साथ दिली आणि देतच राहिन असंही करण म्हणाला. करण शाखरुखच्या अनेक चित्रपटाचा निर्माता, दिग्दर्शक होताच पण त्याच्या गाजलेल्या ‘दिल वाले दुल्हनिया ले जायेंगे’ या चित्रपटात करणनं अभिनयही केला होता. तेव्हापासून या दोघांची मैत्री अधिकाधिक घट्ट होत गेली.