बॉलिवूडमध्ये रोज नवनवीन स्टार्स उदयाला येत असतात.त्यामुळे बॉलिवूडमध्ये आपलं स्थान  अढळ करण्यासाठी प्रत्येक कलाकारांमध्ये चढाओढ लागलेली असते. मात्र कितीही नवनवीन कालाकार आले तरी या सा-यांमध्ये  कायमच अग्रस्थानावर असणारे काही कलाकार आहेत. जे कायमच ‘एव्हरग्रीन’ म्हणून ओळखले जातात. त्यातीलच दोन नावं म्हणजे अभिनेता अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान. उत्तम अभिनय कौशल्य, चित्रपटांची योग्य निवड आणि चित्रपटातील भूमिकेला दिलेला योग्य न्याय हे या दोन्ही कलाकारांमधील खास वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे त्यांना एकत्र काम करावे अशी त्यांच्या चाहत्यांची प्रचंड इच्छा आहे. मात्र, गेल्या १० वर्षामध्ये हा योग जुळून न आल्यामुळे त्यांच्या चाहत्यांची निराशा होतांना दिसून येत आहे. मात्र हा योग लवकरच जुळून येईल असे सांगण्यात येत आहे.

अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांनी २००८ साली ‘भूतनाथ’ या चित्रपटामध्ये एकत्र काम केले होते. त्यानंतर त्या दोघांनी गेल्या दहा वर्षामध्ये एकही चित्रपट एकत्र केलेला नाही. परंतु सुजॉय घोष यांच्या आगामी ‘बदला’ या चित्रपटाच्या माध्यमातून ते एकत्र काम करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सुजॉय घोष यांचा ‘बदला’ हा चित्रपट साहसपट असून या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नू एकत्र झळकणार आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी शाहरुख खान याने उचलली आहे. त्यामुळे शाहरुख निर्मित चित्रपटामध्ये बिग बी झळकणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

‘अमिताभ बच्चन यांच्या कामाचा अनुभव आणि त्यांची अभिनयशैली इतकी दमदार आहे कि चित्रपट प्रदर्शनातील अर्धी लढाई त्यांच्या येण्यामुळेच आपण जिंकलेलो असतो. त्यामुळे सध्या त्यांच्याबरोबर काम करण्यास मी प्रचंड उत्सुक आहे. ‘बदला’ या चित्रपटामध्ये त्यांच्याबरोबर तापसी पन्नूदेखील झळकणार असून शाहरुख खान यावेळी निर्मात्याची भूमिका पार पाडणार असल्याचे’, सुजॉय यांनी मुंबई मिरर या वृत्तपत्राशी बोलतांना सांगितले.

सुजॉय यांनी यापूर्वी ‘अलादीन’ आणि ‘Te3n’ हे चित्रपट दिग्दर्शित केले असून या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन झळकले आहेत. ‘बदला’ हा चित्रपट ‘द इनव्हिजेबल गेस्ट’ या स्पॅनिश चित्रपटाचा रिमेक असून अमिताभ यांनी १४ जून रोजी ट्विटरच्या माध्यमातून या चित्रपटाची माहिती दिली होती.