संसार म्हटलं की भांड्याला भांड लागणारच, नवरा बायकोत कधी ना कधी खटके उडणारच. मग याला सेलिब्रिटीसुद्धा अपवाद नसतात. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेता शाहिद कपूरने पत्नी मीरा राजपूतशी होणाऱ्या वादविवादाविषयी, भांडणांविषयी सांगितलं.

‘बायकोसोबत माझी जेव्हा कधी भांडणं होतात, तेव्हा मला काय करावं हे सुचतच नाही. भांडणांचा त्रास मला नक्कीच होतो आणि त्यातून सावरण्यासही वेळ लागतो. दोन महिन्यांतून एकदाच असं काहीतरी आमच्यात भांडण होतं पण मग ते १५ दिवस सुरूच राहतं,’ असं शाहिद म्हणाला. शाहिद व मीराच्या लग्नाला येत्या ६ जुलै रोजी चार वर्षे पूर्ण होतील. साथीदारासोबत असलेल्या मतभेदांबद्दल तो पुढे म्हणाला, ‘भांडण होणं ही चांगलीच गोष्ट आहे. एकमेकांच्या मताशी सहमत नसणं स्वाभाविक आहे. पण एकमेकांच्या स्वभावाला स्वीकारणं आणि त्यातून समस्या सोडवणं महत्त्वाचं आहे. त्या सोडवून पुढे जाणं महत्त्वाचं आहे.’

शाहिद व मीराला एक मुलगी व एक मुलगा आहे. मुलगी मीशा दोन वर्षांची तर मुलगा झैन आठ महिन्यांचा आहे. सध्या शाहिद त्याच्या आगामी ‘कबीर सिंग’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. तेलुगू चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’चा हा रिमेक आहे. या चित्रपटात शाहिदसोबत कियारा अडवाणीची मुख्य भूमिका आहे.