बॉलिवूड गाजवणारी जोडी म्हणजे ‘करण-अर्जुन’ उर्फ सलमान खान आणि शाहरूख खानची जोडी होय. २००२ साली प्रदर्शित झालेल्या ‘हम तुम्हारे हे सनम’ चित्रपटानंतर ही जोडी रुपेरी पडद्यावर एकत्र पहायला मिळाली नव्हती. चाहत्यांमध्ये या जोडीला पुन्हा एकदा पडद्यावर पाहण्यासाठी फार उत्सुकता आहे. आता चाहत्यांची ही इच्छा दिग्दर्शक संजय लीला भन्साळी पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार असून चाहत्यांना तो सुखद धक्काच असणार आहे.

सध्या संजय लीला भन्साळी एक, दोन नव्हे तर तब्बल तीन मोठ्या प्रोजेक्टवर काम करत आहेत. १९५२मधील मीना कुमारी यांच्या ‘बैजू बावरा’ या चित्रपटाचा रिमेक संजय लीला भन्साळी काढणार असल्याचं म्हटलं जात आहे. या रिमेकमध्ये अभिनेता सलमान खान आणि शाहरुख खान एकत्र काम करणार असल्याची चर्चा सगळीकडे सुरु आहे. चित्रपटात सलमान आणि शाहरुखसोबत अभिनेत्री प्रियांका चोप्रा देखील झळकणार असल्याच कळतंय. तसेच ‘बैजनाथ’, ‘बैजू’ आणि ‘बैजू तानसेन’ अशी तीन नावे संजय लीला भन्साळी यांनी रजिस्टर केली असल्याचं समोर येत आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं अभिनेता सलमान खान आणि संजय लीला भन्साळी तब्बल १९ वर्षानंतर एकत्र काम करणार असून हा चित्रपट २०२०मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

त्याचप्रमाणे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी ‘इंडियन मोशन पिक्चर प्रोड्यूसर्स असोसिएशन’ (IMPPA)मध्ये ‘दिल दे दिया इन्शाअल्लाह’ आणि ‘प्यार हो गया इन्शाअल्लाह’ ही दोन चित्रपटांची नावे देखील रजिस्टर केली असल्याचं समजत आहे.