नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यास आपण देश सोडू, अशा आशयाचे वक्तव अभिनेता शाहरुख खानने केल्याचा लघुसंदेश गेल्या आठवड्यापासून वॉट्सअपसह इतर ऑनलाईन व्यासपीठांवरून फिरतो आहे. या लघुसंदेशामुळे चिडलेल्या शाहरुख खानने सोमवारी एक ट्विट करून आपल्या टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले.
ते सर्वजण ज्या ट्विटबद्दल बोलत आहेत, जो मी केलेलाच नाही, हे सर्व त्या मुर्खांना सांगण्यासाठी हिच योग्य वेळ आहे. खोट्या ट्विटवर विश्वास ठेवू नका, असे ट्विट शाहरुख खानने रविवारी रात्री प्रसिद्ध केले आहे.
मोदी पंतप्रधान झाल्यास शाहरूख देश सोडणार असल्याची चर्चा गेल्या शुक्रवारपासून सर्व ऑनलाईन व्यासपीठांवर रंगली होती. एकीकडे अभिनेता कमाल खानने देश सोडणार हे स्पष्ट झाल्यानंतर शाहरुख खानचे काय, असाही प्रश्न सोशल नेटवर्किंग साईट्सवर विचारला जात होता. या सर्व पार्श्वभूमीवर शाहरुखच्या नव्या ट्विटमुळे त्याची भूमिका स्पष्ट झाली आहे. दरम्यान, कमाल खानने केलेल्या ट्विटमध्ये बदल करून ते शाहरुख खानच्या नावाने पसरविण्यात आल्याची चर्चाही ऑनलाईन वर्तुळात रंगली आहे.