देशभरात लोकप्रियतेचे शिखर गाठणाऱ्या बाहुबलच्या सिक्वलमध्ये शाहरुख खान झळकणार असल्याच्या चर्चा सध्या जोर धरताना दिसत आहे. ‘बाहुबली २’ या चित्रपटामध्ये शाहरुख खान मुख्य भूमिकेत झळकणार नाही. मात्र त्याने या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका करावी, अशी या चित्रपटाच्या दिग्दर्शकांची इच्छा आहे. सूत्रांकडून मिळणाऱ्या माहितीनुसार, शाहरुखने या चित्रपटात काम करावे म्हणून सध्या जोरदार प्रयत्न सुरु आहेत. शाहरुख खानच्या ‘रईस’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाका केला होता. पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानने या चित्रपटात शाहरुखच्या नायिकेची भूमिका साकारली होती. एका वेगळ्या भूमिकेत झळकलेल्या शाहरुखने कमाईच्या बाबतीत ह्रतिक रोशनच्या ‘काबिल’ चित्रपटाला मागे टाकले होते.

‘बाहुबली’ चित्रपटाची टीम किंवा शाहरुख खानने या गोष्टीला अधिकृत दुजोरा दिला नसला तरी, या चित्रपटात शाहरुख कोणत्या भूमिकेत दिसेल याची चर्चा रंगताना दिसत आहे. एवढेच नाही तर पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत तो चित्रपटात किती वेळ प्रेक्षकांचे मनोरंजन करेल, याचे अंदाज बांधण्यात शाहरुखच्या चाहत्यांसह बॉलिवूड दंग झाले आहे. या चित्रपटात शाहरुखच्या नावाला अधिकृत दुजोरा मिळाल्यानंतर चित्रपटात एक नवा रंग येईल यात शंका नाही.

दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांच्या ‘बाहुबली’ या चित्रपटाने प्रेक्षकांवर चांगलीच छाप पाडली होती. त्यामुळे या चित्रपटाच्या दुसऱ्या भागासाठी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाच्या चित्रिकरणाला सुरुवात होती. त्यावेळी चित्रपटाच्या सेटवरील काही फोटो आणि व्हिडिओंनी अनेकांचेच लक्ष वेधले होते. अभिनेता प्रभास, राणा डग्गुबती मुख्य भूमिकेत असणाऱ्या या चित्रपटाचे चित्रिकरण नुकतेच पूर्ण झाले आहे. एस. एस. राजामौली यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन या चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण झाले असल्याचे ट्विट करत काही फोटो शेअर केले होते.

‘..आणि सरतेशेवटी प्रभासने (बाहुबलीने) साडेतीन वर्षांचा प्रवास पूर्ण केला’, असे दिग्दर्शक राजामौली यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले होते. याच ट्विटमधून त्यांनी अभिनेता प्रभासच्या या चित्रपटातील योगदानासाठी त्याचे आभारही मानले होते. ‘बाहुबली २’ या चित्रपटाच्या चित्रिकरणाची सांगता झाल्याचे ट्विट करत सिनेमॅटोग्राफर के. के. सेंथिल यांनीसुद्धा एक सेल्फी पोस्ट केला होता. दरम्यान ‘बाहुबली २’ या चित्रपटाद्वारे एस. एस. राजामौली प्रेक्षकांना पुन्हा एकदा थक्क करण्यासाठी सज्ज झाले आहेत.