शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांचा ओम शांती ओम हा चित्रपट विसरणं अनेकांना शक्य नाही. या चित्रपटाच्या माध्यमातून दीपिकाने कलाविश्वात पदार्पण केलं होतं. हा चित्रपट २००७ मध्ये तुफान लोकप्रिय झाला होता. विशेष म्हणजे आजही या चित्रपटाची लोकप्रियता कायम असल्याचं पाहायला मिळतं. अलिकडेच या चित्रपटाला १३ वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्ताने अभिनेता श्रेयस तळपदेने या चित्रपटाविषयी आणि सेटवरील अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. यात एका चुकीमुळे शाहरुखला संपूर्ण सेटवर जाहीरपणे माफी मागावी लागली होती, असं ‘मुंबई मिरर’च्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.

‘ओम शांती ओम’ या चित्रपटात श्रेयस तळपदेने पप्पू मास्टर ही भूमिका साकारली होती. यात श्रेयस शाहरुखचा अत्यंत जवळचा मित्र दाखविण्यात आला होता. या चित्रपटाच्या निमित्ताने त्याने पहिल्यांदाच शाहरुख व फराहसोबत काम केलं होतं. त्यामुळे हा चित्रपट त्याच्यासाठी खास असून त्याने सेटवरील एकंदरीत वातावरण कसं होतं हे मुलाखतीत सांगितलं आहे.

“ओम शांती ओम चित्रपटाच्या चित्रीकरणाचा पहिलाच दिवस होता. सगळे सेटवर हजर होते आणि फक्त शाहरुखच नव्हता. नेमक्या पहिल्याच दिवशी त्याला सेटवर पोहोचायला उशीर झाला. त्यामुळे फराह खान प्रचंड संतापली होती. त्यातच शाहरुख आल्यानंतर ती त्याला प्रचंड ओरडली आणि तुझ्यामुळे सगळ्यांना वाट पाहावी लागली असं ती शाहरुखला म्हणाली. त्यानंतर फराह खानचं बोलणं ऐकून शाहरुखने पहिल्याच दिवशी सेटवरच्या प्रत्येक व्यक्तीची माफी मागितली”, असं श्रेयसने सांगितलं.

पुढे तो म्हणतो, “माझ्या चांगलं लक्षात आहे, त्यादिवशी शाहरुख माझ्या मेकअप रुममध्ये आला आणि त्याने झालेल्या प्रकारामुळे लाजीरवाणं वाटत असल्याचं म्हटलं. उद्या तुम्ही सगळे १० वाजता या आणि मी ९ वाजताच सेटवर हजर राहिन त्यानंतर आपण शुटींगला सुरुवात करु असं त्याने मला सांगितलं”.

दरम्यान, ‘ओम शांती ओम’ हा चित्रपट अनेकांमध्ये लोकप्रिय असून त्यातील गाणी तुफान लोकप्रिय झाली होती. या चित्रपटाच्या माध्यमातून दीपिका पदुकोण हिने कलाविश्वात पदार्पण केलं होतं. या चित्रपटानंतर शाहरुख- दीपिका ही जोडी ‘चेन्नई एक्स्प्रेस’मध्येदेखील एकत्र झळकली होती.