झी मराठीवरील 'येऊ कशी तशी मी नांदायला' या लोकप्रिय मालिकेतून छोट्या पडद्यावर अभिनेता शाल्व किंजवडेकरनं पदार्पण केले आणि बघता बघता तो आता तरुणींच्या गळ्यातील ताईत बनला आहे. मालिकेप्रमाणेच शाल्वच्या लोकप्रियतेत सुद्धा दिवसागणिक वाढ होत चालली आहे. शाल्वच्या मते पहिल्यांदाच मालिकेत दिग्गज कलाकारांबरोबर काम करण्याचा अनुभव हा खूप आनंददायक आहे. सध्या मालिकेत स्वीटू आणि ओमचं प्रेम बहरताना दिसतंय. मालिका जेव्हा लोकप्रिय होते तेव्हा त्या मालिकेतील कलाकारांची जबाबदारी अजून वाढते. याआधी शाल्व हा चित्रपट आणि वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. पण मालिका क्षेत्रातील पदार्पणातच मिळालेलं प्रेम हे शाल्वसाठी शब्दात वर्णन न करण्यासारखं आहे. ओमची भूमिका ही शाल्वसाठी आव्हानात्मक आहे पण मालिका या माध्यमाबद्दल आणि त्यात काम करण्याच्या अनुभवाबद्दल बोलताना शाल्व म्हणाला, "हा खूप वेगळा अनुभव आहे. याआधी चित्रपट किंवा सीरिजमध्ये मी भूमिका साकारल्या आहेत. पण मालिकेत काम करताना खरंच खूप मजा येतेय.' View this post on Instagram A post shared by Shalva Kinjawadekar (@shalva_kinjawdekar) पुढे तो म्हणाला, 'मालिकेची गोष्ट पुढे सरकते तसं पात्र उलगडत जातं. त्या पात्राला वेगवेगळे कंगोरे मिळत जातात. पुढे काय होणारे हे माहिती नसताना कथानकाप्रमाणे बदलणाऱ्या पात्राची मजा अनुभवता येतेय. अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. मी मालिकेत कधी काम केलं नसल्यानं माझ्यासाठी ते आव्हान ठरेल असं मला वाटलं. पण मालिकेच्या निर्मात्यांना भेटल्यानंतर, तिथला परिसर, वातावरण, सेट सगळंच इतकं छान होतं की मी लगेच होकार दिला." ट्रॉलिंग बद्दल बोलताना शाल्व म्हणाला, "ट्रोलिंग हासुद्धा एक प्रसिद्धीचा भाग आहे. प्रेक्षकांना एखादी गोष्ट मजेशीर वाटते किंवा एखादी गोष्ट आवडत नाही म्हणूनच ते ट्रोल करतात. मालिकेवर जे मीम्स येतात ते मी वाचतो. ते वाचून छान वाटतं की आपल्या मालिकेची चर्चा होतेय."