मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या उत्तम अभिनय शैलीमुळे प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या अभिनेते शरद पोंक्षे. चित्रपट, नाटक आणि मालिका यांच्या माध्यमातून त्यांनी कायमच प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. कधी गंभीर तर कधी विनोदी भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्याने कर्करोगासारख्या आजारावर मात करत पुन्हा एकदा कलाविश्वामध्ये पदार्पण केलं. त्यांचा हा प्रवास खरंच थक्क करणारा होता. लोकसत्ता ऑनलाइनसोबत बोलत असताना त्यांनी त्यांच्या अभिनयापासून ते कर्करोगाशी दिलेल्या झुंजीपर्यंतचा प्रवास शेअर केला. राजेश देशपांडे यांच्या 'हिमालयाची सावली' या नाटकातून त्यांनी कलाविश्वात पुनरागमन केलं. या नाटकानंतर ते 'अग्निहोत्र २' या मालिकेतही झळकणार आहेत. सहा महिने घेतलेल्या औषधोपचार आणि किमोथेरेपीमुळे आजारातून पूर्णपणे बरे झालो असल्याचे सांगत आता पुन्हा एकदा रंगभूमीवर येण्यासाठी सज्ज झालो असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान, शरद पोंक्षे यांनी दूरचित्रवाणीवरील अनेक मालिकांतून आपल्या अभिनयाची छाप सोडली. दूरदर्शन वरील 'दामिनी' या अत्यंत गाजलेल्या मालिकेत त्यांची महत्वाची भूमिका होती. 'अग्निहोत्र', 'वादळवाट', 'कुंकू', 'कन्यादान', 'उंच माझा झोका' या मालिकांनी शरद पोंक्षे यांना महाराष्ट्राच्या घराघरात लोकप्रिय केले.