राशीचक्रकार शरद उपाध्ये यांनी 'चला हवा येऊ द्या' या मालिकेवर जोरदार टीका केली आहे. भाऊ कदम, भारत गणेशपुरे, सागर कारंडे, कुशल बद्रिके आणि श्रेया बुगडे यांसारख्या प्रतिभावान कलाकारांना खालच्या दराच्या भूमिका दिल्या जातात. सुसंस्कृतपणापेक्षा टीआरपी महत्वाचा ठरतोय, अशा शब्दांत त्यांनी मालिकेचा खरपूस समाचार घेतला. फेसबुकवर मोठी पोस्ट लिहित उपाध्ये यांनी सणसणीत टोला लगावला आहे. 'भालचंद्र कदम, भारत गणेशपुरे, सागर कारंडे, कुशल बद्रिके आणि श्रेया बुगडे हे करोडो रुपये किंमतीचे 'कोहीनूर' हिरे. पण त्यांची पारख अस्सल रत्नपारख्यालाच होईल ना! जेव्हा असे हिरे भंगारवाल्याच्या दृष्टीस पडतात, तेव्हा त्याला ती काच वाटते आणि तो एखाद्या फुटाणेवाल्याला ती देऊन एक रुपयाचे फुटाणे विकत घेऊन खातो. खरा हिरा हा मौल्यवान पेटीत मखमलीच्या गादीवर ठेवायचा असतो पण भंगारवाला त्याला घाणेरड्या कागदाच्या पुडीत पुरचुंडी करतो आणि कच-याच्या भावात विकतो. रत्नांचा परीक्षक जव्हेरीच त्यांची अस्सल किंमत जाणतो. दुर्दैवाने हे मौल्यवान हीरे कधी साडीत, कधी लुंगीत, कधी अर्ध्या चड्डीत गुंडाळतात फक्त फुटाणे मिळावेत म्हणून,' असं त्यांनी लिहिलं. या कलाकारांना चांगल्या भूमिका का दिल्या जात नाहीत असा सवाल उपस्थित केला. 'कधीतरी त्यांना खूप आदर्श व्यक्तिमत्वाच्या भूमिकेत, चारित्र्यसंपन्न संतांच्या भूमिकेत, श्रेयाला एखाद्या तेजस्वी महाराणीच्या भूमिकेत सादर केले तर कसला कसदार अभिनय करतील हे हिरे! पण सतत वेडीवाकडी तोंडे, गलिच्छ मेकअप, अत्यंत हीन दर्जाचे पाचकळ विनोद, साड्या, आपल्याच वाहिनीवरच्या मालिकांचे विडंबन, आरडाओरडा, भाडोत्री प्रेक्षकांचे अशोभनीय अंगविक्षेप आणि हसणे, सुमार संदर्भहीन लेखन हे सारे पाहून विषण्ण वाटते. किती प्रतिभावान कलावंत खालच्या दर्जाला नेले जातात. सुसंस्कृतपणापेक्षा टी.आर.पी. महत्वाचा ठरतोय खरा,' अशा शब्दांत त्यांनी खंत व्यक्त केली.