भांडण, वादविवाद, मैत्री, अफेअर या सगळ्या गोष्टींमुळे सतत चर्चेत राहणारा रिअॅलिटी शो म्हणजे बिग बॉस मराठी. काही दिवसांपूर्वी बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात झाली. पहिल्या पर्वाप्रमाणेच यंदाचं पर्वदेखील गाजत आहे. विशेष म्हणजे यंदाचं पर्व घरात रंगणाऱ्या टास्कसाठी चर्चेत येत नसून घरातील सदस्यांमध्ये होणारे हेवे-दावे, वाद, प्रेमप्रकरण यांच्यामुळे गाजत आहे. इतकंच नाही तर घरात घडणाऱ्या या साऱ्या घडामोडींमुळे प्रेक्षकांमधून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहे. काही प्रेक्षकांना हा शो आवडत आहे. तर काही प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यातच कलाविश्वात देखील याचे पडसाद उमटत असून अनेकांनी या शोविषयी त्यांची मत मांडली आहेत. त्यात ‘राशीचक्र’कार शरद उपाध्ये यांनीदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचं मत व्यक्त केलं आहे. किंबहूना या खेळाप्रति त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

फेसबुकच्या माध्यमातून शरद उपाध्ये यांनी बिग बॉस मराठी या शोवर जोरदार टीका केली आहे. हा शो जरी काही प्रेक्षकांना आवडत असला,तरीदेखील घरातील एकंदरीत वातावरण पाहता हा शो आता पाहण्याची इच्छा होत नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यासोबतच घरामध्ये जे काही सुरु आहे, ते एकप्रकारची अतिशयोक्ती असून त्याची आता ‘चला हवा येऊ द्या’ सारखी अवस्था होऊ नये’ अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे.

शरद उपाध्ये यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये घरातील सदस्यांच्या वागणुकीवर भाष्य करत ताशेरे ओढले आहे. घरातील स्त्रियांचं वर्तन बघता त्या ‘कैकयी’ सारख्या भासतात.तर काही सदस्य हे सतत रडत असतात, असं त्यांनी सांगितलं.

पुढे ते म्हणतात, नॉमिनेशनच्या वेळी पोटतिडकीने विरोध आणि एलिमिनेशच्या वेळी नाटकी रडणे,क्षमा मागणे हे प्रेक्षकांना उल्लू बनविण्याचा एपिसोड असतो.पण प्रेक्षक यांचे बारसे जेवलेले असतात.टास्क नावाचा प्रकार WWF सारखा वाटतो.महेशजींच्या सूचनांचा आदर होतच नाही.कोणालाही कोणीही केव्हाही मिठ्या मारतो,गलिच्छ विनोद करतो हे प्रेक्षक दीड तास नाही सहन करू शकत.हे घर आहे का मासळीबाजार! तेच कळत नाही.

दरम्यान, बिग बॉस मराठीचं दुसरं पर्व सुरु होऊन ६६ दिवस उलटले आहेत. या शोमध्ये रोज नवनवीन टास्क रंगत असून बिग बॉसची ट्रॉफी मिळविण्यासाठी सारेच जण कसोशीने प्रयत्न करत आहेत. मात्र या सदस्यांचं घरातील वागणं अनेक प्रेक्षकांना खटकत आहे. शरद उपाध्ये यांनी फेसबुकच्या माध्यमातून त्याचं मत जाहीरपणे व्यक्त केलं आहे. विशेष म्हणजे शरद उपाध्ये कायमच सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचं मत स्पष्टपणे मांडत असतात. यापूर्वी त्यांनी अशाच प्रकारे ‘चला हवा येऊ द्या’ या मालिवकेवर जोरदार टीका केली होती.