सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला आता दीड महिना उलटून गेला आहे. मात्र त्याच्या आत्महत्येनंतर सुरू झालेला वादविवाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. सुशांतवर प्रस्थापितांकडून कसा अन्याय झाला आहे, इथपासून सुरू झालेला हा वाद घराणेशाही, अन्याय-अत्याचार आणि आता शेवटी बॉलिवूडच्या आतले आणि बाहेरचे या मुद्द्यावर येऊन अडकला आहे. ज्येष्ठ अभिनेते व राजकीय नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत गोविंदासोबत अन्याय झाल्याची भावना व्यक्ती केली.

गोविंदाच्या करिअरचा पडता काळ जेव्हा सुरू झाला तेव्हा इंडस्ट्रीने त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं, असं वक्तव्य शत्रुघ्न सिन्हा यांनी केलं. “किशोर कुमार, सोनू निगम यांच्यासारखंच गोविंदानेही त्याचं स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं होतं. अभिनय आणि डान्स यांचा उत्तम समतोल गोविंदामध्ये आहे. पण जेव्हा त्याची वेळ योग्य नव्हती, तेव्हा त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. काही चित्रपटांचं काम सुरू होतं, पण काही लोकांमुळे ते सुद्धा बंद करण्यात आले”, असं ते पुढे म्हणाले.

आणखी वाचा : ‘मालिकेवर टीका केली पण…’; ‘अग्गंबाई सासूबाई’बाबत निवेदिता सराफ यांची पोस्ट 

शत्रुघ्न सिन्हा यांनी अभिनेत्री कंगना रणौतलाही पाठिंबा दिला होता. “मी अनेक लोकांना पाहतोय, त्यांना मनात कंगनाविषयी ईर्षा असल्यामुळे ते तिच्याविरोधात बोलत आहेत. आमच्या दयेशिवाय, आमच्या इच्छेशिवाय, कोणत्याही गटाचा भाग न बनता आणि कोणाच्याही आशीर्वादाशिवाय या मुलीने खूप काही यश संपादन केलंय. तिचं हे यश आणि तिची ही हिंमत पाहून लोकांना तिच्याविषयी ईर्षा वाटू लागली आहे”, असं ते म्हणाले होते.