अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणापासून अभिनेत्री कंगना रणौत चर्चेत आहे. या प्रकरणावर बोलताना कंगनानं मुंबई आणि मुंबई पोलिसांविषयी वक्तव्य केलं होतं. त्यावरून शिवसेना आणि कंगना रणौत असा वादही बघायला मिळाला होता. हा वाद धुसर होत असतानाच शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी कंगनाचा उल्लेख पंगना असा करत डिवचल आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी रोखठोकमधून मोदी सरकारवर टीकास्त्र डागलं आहे. “मध्य प्रदेशात काँग्रेस फोडून भाजपने सरकार बनवलं. बिहारात तेजस्वी यादव या तरुणाने आव्हान उभे केले. कश्मीर खोऱ्यात अस्थिरता कायम आहे. लडाखमध्ये चीन घुसलेलाच आहे. पंजाबच्या शेतकऱ्य़ांवर जोरजबरदस्तीचे प्रयोग सुरू आहेत. पंगना राणावत व अर्णब गोस्वामीला वाचविण्यासाठी केंद्रीय सरकार जमिनीवर उतरले. मुंबईची ‘मेट्रो’ राजकीय अहंकारासाठी अडवून ठेवली. राजकीय साठमारीत आपण जनतेचे नुकसान करतो याचे भान केंद्रातील सत्तेने ठेवले नाही तर रशियातील राज्ये फुटली तसे आपल्या देशात घडायला वेळ लागणार नाही. केंद्र सरकारच्या क्षमतेवर आणि विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे वर्ष म्हणून २०२० कडे पाहावे लागेल,” असं राऊत यांनी म्हटलं आहे.

“लोकांनी स्वतःचे कुटुंब वाचवायचा प्रयत्न करावा. बाकी…”

“प्रत्येक उगवत्या वर्षाने आशेची किरणे दाखवली, पण ती किरणेही शेवटी निराशेच्या अंधारात गडप झाली. आता नव्या वर्षाच्या शुभेच्छा देताना सामान्य लोकांना एकच विनंती करायची आहे, झालं ते पुरे झाले. मानसिक अस्थिरता, अशांतता यांनी भरलेलं २०२० हे वर्ष फार वेगाने संपले आणि मावळत्या वर्षाने काही चांगलं पेरून न ठेवल्यामुळे येणारे २०२१ हे वर्ष नक्की कसे जाईल, त्याचा भरवसा नाही. लोकांनी स्वतःचे कुटुंब वाचवायचा प्रयत्न करावा. बाकी जग सुरूच राहणार आहे,” असं आवाहनही संजय राऊत यांनी केलं आहे.