ग्लॅमरच्या जगतात वावरणाऱ्यांचे खरे चेहरे कित्येकदा वेगळे असतात. ग्लॅमर आणि यशाची चकाचक श्रीमंती एकीकडे आणि दुसरीकडे कामाचा ताण, ताणलेले वैयक्तिक नातेसंबंध अशा कित्येक समस्यांनी हे चेहरे झाकोळलेले असतात. याची कल्पना आपल्याला असणं वेगळं आणि अचानक जेव्हा टीव्ही-चित्रपटाच्या माध्यमातून परिचयाचे झालेले हे चेहरे कुठल्यातरी कारणाने मृत्यूचे धनी होतात तेव्हा धक्का बसल्याशिवाय राहत नाही. मॉडेल सोनिका चौहानचे कोलकात्त्यात अपघाती निधन झाले. ज्या गाडीतून ती प्रवास करत होती त्यातील तिच्याबरोबरचे सहप्रवासी वाचले, ती मात्र त्यातून वाचू शकली नाही. वरवर वाटणाऱ्या या अपघाती निधनामागे एक सत्य हेही होते की गाडीचा चालक, सोनिकाचा मित्र अभिनेता विक्रम चॅटर्जी हा नशेत होता आणि भरधाव वेगाने गाडी चालवत होता. विक्रम या अपघातात किरकोळ जखमी झाला आहे. मात्र त्याने आपण नशेत नव्हतो आणि हा साधा, दुर्दैवी अपघात होता असे म्हणत हात वर केले आहेत. सोनिकाच नाही तर ग्लॅमर जगतातील अनेक मॉडेल्स, अभिनेत्री यांच्या मृत्यूसाठी कळत-नकळत त्यांचे प्रेमसंबंधच जबाबदार ठरल्याचे दिसून आले आहे. सोनिकाच्या निमित्ताने गेल्या वर्षी प्रत्युषा बॅनर्जीने केलेली आत्महत्या ते नफिसा जोसेफ, कुलजीत रांधवा यांच्या आत्महत्येमागची कथा त्यांच्या बिघडलेल्या नातेसंबंधांपर्यंतच जाऊन पोहोचते. दुर्दैवाने, त्यांच्या मृत्यूनंतर काही काळ याबदद्लच्या चर्चा रंगत राहतात मात्र सत्य दडलेलेच राहते. सोनिका चौहान हे केवळ कोलकात्त्यातलेच नाही तर मुंबईच्या मॉडेलिंग जगतातले प्रसिध्द नाव आहे. एका पार्टीनंतर मित्रांबरोबर घरी परतताना सोनिकाच्या गाडीला अपघात झाला आणि त्यात तिचा मृत्यू झाला. मात्र सोनिकाच्या मृत्यूची जबाबदारी विक्रमने घ्यायलाच हवी, अशी प्रतिक्रिया त्या पार्टीत सोनिकाबरोबर असलेल्या मैत्रिणीने प्रसारमाध्यमांना दिली होती. विक्रम चॅटर्जीने आपण मद्यपान केलेच नव्हते आणि गाडीचा वेगही फार नव्हता, असे सांगितले होते. त्यावरून त्याला सोडूनही देण्यात आले. मात्र गाडीच्या तपासणीनंतर गाडीचा वेग जास्त होता हे निष्पन्न झाले. पार्टीत प्रत्येकानेच मद्यपान केले होते, विक्रम आणि सोनिकाही त्याला अपवाद नव्हते. मात्र विक्रमने मद्यपान क रून गाडी चालवायला नको होती. विक्रमच नाही तर त्यावेळी त्यांच्याबरोबर गाडीत असलेला प्रत्येकजण या अपघातासाठी जबाबदार असल्याचे सोनिकाच्या मैत्रिणीचे म्हणणे होते. सोनिकाच्या या मृत्यूची चर्चाही काही काळ रंगेल पण तिच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांना शिक्षा होईलच, असं ठामपणे म्हणता येईल? गेल्यावर्षी ‘बालिकावधू’ मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीची आत्महत्याही तिच्या चाहत्यांना धक्का देणारी ठरली. मॉडेलिंग किंवा मालिकांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांसाठी अचानक मिळणारे यश पेलवणं जसं एक आव्हान असतं तसंच त्या यशाबरोबर त्या त्या क्षेत्रात पुढे टिकून राहण्यासाठीचा संघर्षही कित्येकदा मानसिकदृष्टय़ा त्यांना थकवणारा असतो. अशावेळी वैयक्तिक आयुष्यात प्रेमसंबंधांमध्ये तणाव निर्माण झाला तर कित्येकदा आत्महत्येचा टोकाचा मार्ग स्वीकारला जातो. प्रत्युषाच्याच बाबतीत बोलायचे तर ‘बालिकावधू’नंतर प्रत्युषाने ‘बिग बॉस’ शो केला. तिच्याकडे काम नसल्याने ती तणावाखाली असल्याची चर्चा होती. मात्र प्रत्युषाच्या आत्महत्येमागे तिचा प्रियकर राहुल राज सिंग याचा हात आहे, असे प्रत्युषाच्या या क्षेत्रातील मैत्रिणी, कामया पंजाबीसारखी सहकलाकार यांचे ठाम मत आहे. कामयाने तर प्रत्युषाच्या जीवनावर छोटा माहितीपट तयार करून यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्युषाकडे काम नव्हते अशी चर्चा होती. मात्र काम असूनही केवळ प्रेमसंबंधांत हार पत्करल्यामुळे मृत्यूचा मार्ग जवळ के ल्याचे मॉडेल नफिसा जोसेफसारखे उदाहरणही दुर्लक्ष करता येत नाही. ‘एमटीव्ही’ची प्रसिध्द व्हीजे, ‘मिस इंडिया युनिव्हर्स’, ‘मिस युनिव्हर्स’ सारखे किताब मिळवणाऱ्या नफिसाने उद्योगपती गौतम खांदुजा याच्याबरोबरचा विवाह मोडला म्हणून वयाच्या सव्वीसाव्या वर्षी आत्महत्या करून जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. कुलजीत रांधवासारखी अभिनेत्री जी डॅशिंग भूमिकांसाठी प्रसिध्द होती. तिच्याकडे काम नव्हते असं कोणीही म्हणू शकत नाही. पैशाचीही अडचण नव्हती. तरीही तिने आत्महत्या केली. तिने आत्महत्येचा टोकाचा पर्याय निवडला कारण तिचाही प्रेमभंग झाला होता. आणि त्यातून सावरण्याचा ती प्रयत्नही करत होती. मात्र त्यातून बाहेर पडण्याऐवजी ताण आणि नैराश्याने तिला घेरले. सतत मूडमध्ये होणारे टोकाचे बदल तिला सहन होत नव्हते आणि म्हणून तिने मृत्यू स्वीकारला. मॉरिशसहून मुंबईत स्थिरावलेल्या मॉडेल कम अभिनेत्री विवेका बाबाजीची शोकोंतिकाही यापेक्षा वेगळी नव्हती. तिच्याही मृत्यूमागे बिघडलेले प्रेमसंबंध हे मुख्य कारण होते. ग्लॅमरच्या या क्षेत्रातील संघर्ष आणि यशाची गोष्ट नविन नाही. बदलत्या काळाबरोबर या क्षेत्रातील आव्हानं वाढली आहेत, तशी संधीची दालनंही उघडी झाली आहेत. माहिती आणि मदतीचा खजिना हाताशी आहे. तरीही या क्षेत्राला असलेली काळी झालर आजही तशीच आहे. कारण काहीही असो वर्षांवर्षांंच्या अंतराने कोणाएका मॉडेलचा, अभिनेत्रीचा किंवा अभिनेत्याचा अशाप्रकारचा मृत्यू आजही त्यांच्या चाहत्यांनाच नाही तर सर्वसामान्यांनाही चटका लावून जातो.