देशात करोनाचा कहर वाढू लागला आहे. त्यात महाराष्ट्रातही रुग्णसंख्या वेगाने वाढतेय. अशात गेल्या काही दिवसांपासून अनेक सेलिब्रिटी सुट्टी एन्जॉय करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणांना जाणं पसंत करत आहेत. गेल्या काही दिवसांत अनेक जण मालदीवला गेल्याचं दिसून आलं. सेलिब्रिटी विविध ठिकाणी सध्या कुटुंबासोबत आणि जवळच्या व्यक्तींसोबत फिरायला जात आहे. बिकिनीतील किंवा समुद्र किनाऱ्यावरील फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत. या फिरायला जाणाऱ्या सेलिब्रिटींच्या वागण्यावर अभिनेत्री श्रुति हसन हिने नाराजी व्यक्त केली आहे. श्रुति हसनने वाढत्या करोना संक्रमणावर चिंता व्यक्त करत अशा वेळी सुट्टीवर जाणाऱ्या सेलिब्रिटींवर नाराजी व्यक्त केली आहे. सेलिब्रिटींचं वर्तन असंवेदनशील असल्याचं ती क्विंटला दिलेल्या एका मुलाखतीत म्हणाली आहे. ती म्हणाली, "मला आनंद आहे की त्यांना एक चांगली सुट्टी मिळाली. तो त्यांचा अधिकार आहे. मात्र वैयक्तीक मला या काळात मास्क न घालता पूलमध्ये मज्जा करणं योग्य वाटत नाही. प्रत्येकासाठी ही कठीण वेळ आहे आणि काहींसाठी तर खूपच खडतर." पुढे ती म्हणाली, " मला वाटतं तुमच्याकडे ज्या सुखसोयी आहेत त्यासाठी तुम्ही आभारी आणि कृतज्ञ असायला हवं. तुमच्याकडील सुखसोयींचा लोकांसमोर दिखावा करण्याची ही गरज नाही." असं म्हणत सोशल मीडियावर सुट्टीचे फोटो पोस्ट करणाऱ्यांवर तिने निशाणा साधला. View this post on Instagram A post shared by Shruti Haasan (@shrutzhaasan) या मुलाखतीत श्रुतिने या काळात तिने कायम कशी काळजी घेतली हे सांगितलं. ती म्हणाली, " या महामारी मुळे मी कायम चिंता व्यक्त करायचे अनेकदा लोकांनी मला वेड्यात काढलं. जेव्हा लोकं नॉर्मल आयुष्याकडे वळू लागले होते तेव्हा देखील मी खूप काळजी घ्यायचे. मात्र लोकांना ते खटकलं. " अनेकांनी दुसऱ्या लॉकडाउन आधीच सुट्टीचे प्लॅन केले असल्याचं ती म्हणाली. वाचा : “हे बघा पळपुटे” ; मालदीव ट्रीपमुळे आलिया भट्ट आणि रणबीर कपूर ट्रोल नुकतेच आलिया भट्ट आणि रणबीर कपूरदेखील मालजीव ट्रीपमुळे ट्रोल झाल्याचं दिसून आलं. देश करोनाशी दोन हात करत असताना सेलिब्रिटी मात्र फिरायला जात असल्याची टीका अनेकांनी यावेळी केली.