अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने यंदापासून सुरु करण्यात आलेल्या पुरस्कार सोहळ्यामध्ये ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ‘स्वामीरत्न’ राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. तर मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता स्वप्नील जोशी याला ‘स्वामीभूषण’ राज्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.

आशा भोसले यांना मिळालेल्या ‘स्वामीरत्न’ राष्ट्रीय पुरस्काराचे स्वरुप पाच लाख रुपये रोख, सन्मानचित्र व सन्मानपत्र असे असून राज्यस्तरीय ‘स्वामीभूषण’ पुरस्काराचे स्वरूप प्रत्येकी एक लाख २५ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे आहे.

‘परमेश्वराच्या कृपेने, आई वडिलांच्या आशीर्वादामुळे आणि तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे आजपर्यंत मला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. प्रत्येक पुरस्कार हा मला पाठीवर शाबासकीची थाप आणि खूप आनंद देऊन जातो. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ यांनी यावर्षीपासून सुरु केलेल्या ‘स्वामीभूषण’ हा राज्यस्तरीय पुरस्कार मला प्रदान करण्यात आला आणि याचा पहिला मानकरी मी आहे याचा मला खूप आनंद आहे’, असं स्वप्नील जोशी म्हणाला.

तो पुढे म्हणाल की ‘हा पुरस्कार माझ्यासाठी खूप खास आहे याच कारण असं की, ज्या श्री स्वामी समर्थांचं नाव ऐकून माझा जन्म झाला, ज्या स्वामींच्या आशीर्वादाने इथं पर्यंत पोहोचलो, ज्यांना मी माझ्या गुरुस्थानी मानतो, या पुरस्काराच्या निमित्ताने पुन्हा मला जाणवलं ते खरंच आपल्या पाठीशी आहेत आणि त्यामुळे मला जास्त जोमाने काम करण्याचा नवं चैतन्य, नवा हुरूप आला आहे’.

दरम्यान, या राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष पं. ह्दयनाथ मंगेशकर होते. या समितीवर ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ, संयोजक अनुषा अय्यर यांचाही समावेश आहे. २९ जुलै १९८८ रोजी, गुरूपौर्णिमेच्या दिवशी स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची स्थापना झाली होती. यंदा मंडळाला ३२ वर्षे पूर्ण होत आहेत. त्याचे औचित्य साधून अन्नछत्र मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष जन्मेंजयराजे भोसले यांनी अक्कलकोट नरेश श्रीमंत विजयसिंहराजे भोसले यांच्या स्मरणार्थ अक्कलकोटनिवासी ब्रह्मांडनायक स्वामीरत्न राष्ट्रीय, स्वामीभूषण राज्यस्तरीय आणि स्वामीसेवक जिल्हास्तरीय पुरस्कार महनीय व्यक्तींना दरवर्षी गुरूपौर्णिमेच्या दिवशी समारंभपूर्वक प्रदान करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.