आषाढ महिना जवळ आला की पंढरपूरला जाण्याचे वेध वारकऱ्यांना लागतात. साडेतीनशेहून अधिक वर्षांची परंपरा असलेली वारी यंदा करोनाच्या प्रादुर्भावामुळे होऊ शकली नाही, वारीच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं आहे. मात्र प्रत्येक विठ्ठलभक्ताच्या मनात विठूमाऊली आणि रखुमाईची मूर्ती कोरली गेली आहे. त्यामुळे आज हे भक्त करोना संकटामुळे जरी घरी असले तरी विठ्ठल भक्तीत लीन झाल्याचं पाहायला मिळत आहेत. त्यातच सध्या 'विठ्ठला' हे नवीन गाणं अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. विठ्ठल भक्ती आणि वारी यावर आधारित असलेलं हे गाणं महेश काळे यांच्या आवाजात स्वरबद्ध झालं आहे. विशेष म्हणजे या गाण्याचे बोल उर्दू भाषेत असल्यामुळे अनेकांचं लक्ष त्याच्याकडे आकर्षित झालं आहे. तसंच या गाण्यात वापरण्यात आलेले काही छायाचित्र खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टिपले आहेत. वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, भक्तीत तल्लीन झालेले भक्त, अबाल-वृद्धांपासून प्रत्येक व्यक्तीच्या अंगात असलेला विठ्ठलभेटीचा उत्साह सुंदररित्या या गाण्यात दाखविण्यात आला आहे. “या वर्षी वारी होऊ शकत नसल्यामुळे देवापर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यासाठी आम्ही या गाण्याची निर्मिती केली आहे. शिवाय या गाण्याच्या व्हिडीओमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या ‘एरियल फोटोग्राफी’चा अत्यंत कल्पकतेने वापर करण्यात आला आहे. मी अभंग-भजन या सांप्रदायात लहानाचा मोठा झालो असल्यामुळे अभंग गातांना मला जो आनंद मिळतो,तो एक विलक्षण अनुभव असतो. हे गाणं करतांना आमच्या डोक्यात एक कल्पना आली की जर महाराष्ट्राची परंपरा माहित नसलेला एखादा सुफी संत वारीच्या काळात महाराष्ट्रात आला तर त्याच्यासाठी अनोळखी असलेली ही परंपरा त्याच्या दिव्यत्वामुळे त्याला त्याच्या ओळखीची वाटली तर तो या परंपरेबद्दल आपुलकीने कसा व्यक्त होईल हे दर्शवणारे हे गाणं आहे,” असं महेश काळे म्हणाले. दरम्यान, या व्हिडीओत वापरण्यात आलेली काही छायाचित्रे खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या कॅमेरातून टिपलेली आहेत. तर त्यांच्यासोबत संदेश भंडारे आणि योगेश पुराणिक यांनीही काही फोटो टिपले आहेत. हे गाणं महेश काळे यांनी स्वरबद्ध केलं असून कवी-गीतकार वैभव जोशी आणि संगीतकार नरेंद्र भिडे यांनी हे गाणं तयार केलं आहे.