संजय लीला भन्साळी यांच्या 'पद्मावत' चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने यू/ए प्रमाणपत्र देऊन प्रमाणित केले असले तरीही या चित्रपटामध्ये सेन्सॉरने काही महत्त्वाचे बदल सुचवले होते. सेन्सॉरने दिलेल्या सल्ल्यानंतर भन्साळींनी चित्रपटाच्या नावातही बदल केला. त्यामागोमागच आता चित्रपटातील गाण्यांवरही टांगती तलवार आल्याचे वृत्त 'स्पॉटबॉय ई'ने प्रसिद्ध केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या चित्रपटात श्रेया घोषालची तीन गाणी होती. पण, कथानकात काही बदल सुचवण्यात आल्यामुळे आता मात्र तिची ही गाणी वगळण्यात आल्याचे कळतेय. सेन्सॉरने सुचवलेल्या बदलांची पूर्तता करण्यासाठी शेवटच्या क्षणी निर्माते आणि दिग्दर्शकांकडे कोणताच पर्याय नसल्यामुळे अखेर त्यांनी श्रेयाची गाणी वगळण्याचा निर्णय घेतला. कर्ता, कर्म आणि ‘करनी’ भन्साळींच्या या स्वप्नवत प्रोजेक्टमध्ये श्रेयाची तीन गाणी असणार हे कळल्यापासून प्रेक्षकांमध्ये त्याविषयीची बरीच उत्सुकता पाहायला मिळाली होती. पण, आतापर्यंत तिचे एकच गाणे ऐकण्यास मिळाल्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून काही चाहत्यांनी निराशा व्यक्त केली. अशाच एका चाहतीच्या ट्विटला उत्तर देत श्रेयाने लिहिले, 'एका मोठ्या प्रोजेक्टविषयी काही महत्त्वाचे निर्णय घेत असताना अशा गोष्टी घडतच असतात. हे टाळता येत नाही. अशी बरीच गाणी आहेत, जी ध्वनीमुद्रित केल्यानंतरही संहिता आणि दृश्यांमध्ये केल्या जाणाऱ्या बदलांमुळे चित्रपटातून वगळण्यात येतात. बऱ्याचदा चांगली गाणी कोणताही हेतू नसतानाही चित्रपटातून वगळावी लागतात.' श्रेयाचे हे ट्विट पाहता 'पद्मावत' चित्रपटाच्या वाटेत अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत बऱ्याच अडचणी होत्या याचीच पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.