करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वचजण घरातून अडकून पडले आहेत. सध्याच्या कठिण काळात प्रेक्षकांचे मनोरंजन व्हावे म्हणून दूरदर्शन वाहिनीवरील ८० ते ९० च्या काळातील गाजलेल्या मालिका पुन्हा दाखवण्यास सुरुवात केली. या यादीमधील प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणारी मालिका म्हणजे ‘श्रीमान श्रीमती.’ त्यावेळी ही मालिका जवळपास पाच वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी ठरली होती. मालिका इतर भाषांमध्येही डब करण्यात आली होती. या मालिकेतील केशव कुलकर्णी या पात्राने लाखोंच्या मनावर राज्य केले होते. पण ही मालिका पुन्हा पाहण्यासाठी आज तो आपल्यामध्ये नाही. ‘श्रीमान श्रीमती’ या मालिकेत केशू म्हणजेच केशव कुलकर्णी हे पात्र अभिनेते जतिन कनकिया यांनी साकारले होते. जतिन यांनी 'श्रीमान श्रीमती' या मालिकेत काम करत अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली होती. पण या पहिल्याच मालिकेने त्यांना लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलवे होते. श्रीमान श्रीमती मधील त्यांची रीमा लागू यांच्यासोबतची जोडी प्रेक्षकांनी खूप पसंत केली.त्यांनी हिंदी मालिका आणि चित्रपटांसोबतच अनेक गुजराती नाटकांमध्ये काम केले आहे. 'कभी ये कभी वो', 'पड़ोसन', 'बात एक राज़ की', 'चश्मे बहाद्दूर', 'गुदगुदी', 'ऑल दि बेस्ट' आणि 'मिसेज माधुरी दीक्षित' या लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आहे. ते छोट्या पडद्यावरील 'प्रिंस ऑफ कॉमेडी' म्हणून ओळखले जायचे. पण १९९९ मध्ये जतिन कनकिया यांनी जगाचा निरोप घेतला. वयाच्या ४६व्या वर्षी त्यांचा कर्करोगाने मृत्यू झाला. जतिन यांनी १९९४ साली अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले होते. त्यानंतर पाच वर्षांमध्ये ते यशाच्या शिखरावर पोहोचले होते. या पाच वर्षात त्यांनी २० पेक्षा अधिक मालिकांमध्ये काम केले होते. ९०च्या दशकात ‘श्रीमान श्रीमती’ या मालिकेने आपला वेगळाच प्रेक्षक वर्ग निर्माण केला होता. या मालिकेतील केशव कुलकर्णी, कोकिला कुलकर्णी, चिंटू दिलरुबा, फिल्मस्टार प्रेमा शालिनी, गोखले, शर्माजी ही पात्र आजही लोकांच्या चांगलीच लक्षात आहेत. त्यामुळे ‘रामायण’, ‘महाभारता’नंतर ही मालिका पुन्हा दाखवण्यात यावी अशी मागणी सोशल मीडियावर होऊ लागली होती. प्रेक्षकांच्या या मागणीनंतर मकरंद अधिकारी यांची ‘श्रीमान श्रीमती’ ही मालिका दूरदर्शन वाहिनीवर दुपारी ४ वाजता प्रदर्शित होऊ लागली. या मालिकेत जतीन कनकिया, रीमा लागू, राकेश बेदी, अर्चना पूरण सिंह हे प्रमुख भूमिकेत होते. आता हे कलाकार पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.