बॉलिवूड आणि वादविवाद हे जणू समीकरण ठरलेलंच आहे. अभिनेत्यांमधील वादविवाद, अभिनेत्रींमधील कॅटफाइट यांची नेहमीच चर्चा होत असते. वाढत्या स्पर्धेमुळे, प्रेमाच्या त्रिकोणामुळे, किंवा अन्य कोणत्याही लहानसहान गोष्टींवरून हे कॅटफाइट होतच असतात. सोनम कपूर आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्यामधील दहा वर्षांपूर्वीचा असाच एक वाद अखेर मिटला आहे. दहा वर्षांपासूनचा अबोला संपवत सोनमनं ऐश्वर्यासोबत सूत जुळवलं आहे.

ऐश्वर्याला स्वत: फोन करून सोनमने तिच्या लग्नाचं आमंत्रण दिल्याची माहिती समोर येत आहे. प्रियकर आनंद अहुजासोबत सोनम उद्या (मंगळवारी) लग्नगाठ बांधत आहे. त्यामुळे झालं-गेलं ते विसरून ऐश्वर्या या विवाहसोहळ्यात सहभागी होणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

वाचा : हात जोडून बिग बी नेमकी कोणाला विनवणी करत आहेत?

दहा वर्षांपूर्वी सोनमने ऐश्वर्याला ‘जुन्या पिढीतीली आंटी’ असं चि़डवलं होतं. ‘कान’ चित्रपट महोत्सवाशी निगडीत एका कॉस्मेटिक ब्रँडची अॅम्बेसिडर म्हणून सोनमने ऐश्वर्याची जागा घेतली होती. सोनमला रेड कार्पेटवर चालण्याची संधी मिळू नये, यासाठी ऐश्वर्याने कटकारस्थान रचल्याचंही म्हटलं जातं. तेव्हापासून सोनम आणि ऐश्वर्या यांच्यामध्ये शीतयुद्ध सुरु आहे. मात्र लग्नाच्या निमित्ताने हा दुरावा मिटवण्यासाठी सोनमने पुढाकार घेतला. सोनमच्या आईने ऐश्वर्याला निमंत्रण दिलं. त्यानंतर सोनमने स्वतः फोन करुन ऐश्वर्याला अगत्याने येण्यास सांगितलं.