आतापर्यंत अनेक चित्रपट, मालिका यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज, छ. संभाजी महाराज यांच्या जीवनातील अनेक पैलू उलगडण्यात आले. मात्र पहिल्यांदाच ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेच्या माध्यमातून राजमाता जिजाऊ यांचा प्रवास उलगडण्यात येत आहे. सरदारांची वर्दळ, युद्धाचे डावपेच, सल्लामसलत, न्याय निवाड्यात जाणारा दिवस तर कधी युद्ध कलांचं प्रशिक्षण घेण्यात त्याचं बालपण गेलं. मात्र आता त्या हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या दिशेने वळाल्या आहेत. पारतंत्र्यात असलेल्या रयतेची वेदना जिजांनी लहानपणीच पाहिल्या आहेत. त्यामुळे मनोमनी या एकंदर परिस्थितीशी दोन हात करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. थोड्या फार फरकाने एकाच विचाराच्या असणाऱ्या जिजा आणि शहाजींचं लग्न झालं आणि जिजांच्या आयुष्यात स्वातंत्र्याची पहाट होऊ लागली. त्यांचं कर्तब थोर होतंच त्यात आपलं स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या कटीबध्द ही होत्या. त्यासाठीच शिवबांना युध्दकलेत पारंगत करणं असो किंवा स्त्रियांचा सन्मान करणे हे सारे संस्कार त्यांनी शिवबांवर केले. तसंच जाती – धर्मांमध्ये फरक न करता सगळ्यांना समान वागणूक देण्याचे संस्कार ही शिवबांवर त्यांनी केले. शहाजी राजांच्या गैरहजेरीत मातृत्त्वाची जबाबदारी पार पाडतानाच जनतेचे प्रश्न सोडवण्याचं काम ही त्यांनी चोखपणे पार पाडलं. हे सारे प्रसंग स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेतून उलगडण्यात आले. गेल्या काही दिवसांत या मालिकेच्या माध्यमातून समोर आलेलं जिजाऊंचं हे कणखर व्यक्तिमत्त्व आता त्याच्या पुढच्या टप्प्यात पाऊल ठेवणार आहे. जिजाऊंच्या बालपणापासून ते आताच्या कणखर धैर्यशाली जिजाऊ यांचा हा अनोखा प्रवास " स्वराज्यजननी जिजामाता" या मालिकेतून आपल्या समोर उलगडणार आहे. बालपणीच जिजाऊंच्या मनी रोवलं गेलेलं स्वराज्याचं बीज मूर्तरूपात पाहण्यासाठी तिची धडपड डॉ.अमोल कोल्हे आणि जगदंब क्रिएशन्स निर्मित “स्वराज्यजननी जिजामाता” मालिकेतून प्रेक्षकांना पाहता येणार आहे. जिजा-शहाजीचं बालपण आता सरलं असून मोठ्या जिजाची भूमिका आता अमृता पवार या मालिकेत साकारत आहे. तर शहाजींच्या भूमिकेत अभिनेता रोशन मनोहर विचारे दिसणार आहे.