‘हसते रहो इंडिया’ या शोच्या यशानंतर सोनी सब आता मनोरंजनाची एक खास मेजवानी आपल्या प्रेक्षकांना देणार आहे. ‘मंगलम दंगलम – कभी प्यार कभी वार’ असे या मालिकेचे नाव असल्याचे नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या मालिकेत सासरा आणि जावई यांचे नाते उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ‘मंगलम दंगलम’ ही गडबड गोंधळाने परिपूर्ण अशी आणि हसवाहसवी करणारी मालिका आहे.

अर्जुन (करणवीर शर्मा) हा एक उपवर तरुण इंदूरमधील एका दाक्षिणात्य कुटुंबातील असून तो वकील आहे. त्याची भेट होते एका साध्या पण उन्मुक्त व्यक्तिमत्व असलेल्या रुमी या मुलीशी, जिची भूमिका साकारली आहे मनीषा रावत हिने. ही खेळकर मुलगी तिच्या संस्कारांमध्ये रुजलेली आहे. एक उच्च मध्यमवर्गीय व्यापारी असलेल्या तिच्या वडिलांनी तिला एखाद्या राजकन्येसारखी वाढवली आहे आणि तिचेही त्यांच्यावर खूप प्रेम आहे. इतके की, ती तिच्या आयुष्यातला कुठलाही निर्णय त्यांच्या परवानगीशिवाय घेत नाही. अर्जुन आणि रुमी एकमेकांच्या प्रेमात पडतात पण जेव्हा अर्जुन संजीव संकलेचा (मनोज जोशी ) यांच्याकडे, म्हणजेच रूमीच्या वडिलांकडे तिचा हात मागायला जातो, तेव्हा समस्या निर्माण होते. मग सुरु होतो संजीव आणि अर्जुन यांच्यातला संघर्ष. अर्जुन रुमीला घेऊन जाऊ इच्छितो, तर संजीव तिला जाऊ देत नाहीत.

संजीव यांची पत्नी संगीता संकलेचा (अंजली गुप्ता ) ही एक उत्साही गृहिणी आहे. अर्जुनची आई चारुलता कुट्टी (अनिता कुलकर्णी ) ही इंदूरमध्ये एक कायद्याची प्राध्यापक आहे. ती एक शिस्तप्रिय आणि परंपरावादी आई आहे, तर अर्जुनचे वडील वेंकटेश कुट्टी (अभय कुलकर्णी ) हे एक निवृत्त वकील आणि सल्लागार आहेत, ज्यांना त्यांचा सारा वेळ संगीताची आराधना करण्यात आणि चारुलतासमोर विनोद करण्यात जातो. इतर महत्वाच्या भूमिका आणि कलाकार असे आहेत. कृतिका शर्मा (शुभा खोटे) या रूमीच्या आजी, अर्जुनची बहिण कृतिका शर्मा आणि प्रविष्ट मिश्रा हा रुमीचा भाऊ.