गेल्या एक दशकापासून स्टार प्रवाहने अनेक उत्तमोत्तम मालिका महाराष्ट्राला बहाल केल्या. या मालिकांच्या निमित्ताने, स्टार प्रवाहने अनेक कलाकारांना लाँचही केले; मग ते प्रमुख अभिनेते, सहाय्यक अभिनेते, होतकरू निर्माते किंवा गायक, गीतकार, संगीतकार असो. योग्य त्या प्रतिभेला ओळखून स्टार प्रवाह अशा कलाकारांच्या पाठीशी खंबीरपणे नेहमी उभे राहिले. स्टार प्रवाहवर नुकत्याच सुरु झालेल्या 'नकळत सारे घडले' या मालिकेच्या गीतकाराचीही कहाणी नक्कीच प्रेरणादायी आहे. ऑफिस बॉय म्हणून काम करतानाच आपली कवितेची आवड जपत गीतकार होण्याचा निलेश उजाळचा प्रवास नक्कीच प्रेरणादायी आहे. स्टार प्रवाहच्या 'नकळत सारे घडले' या मालिकेचं टायटल साँग नीलेशच्याच लेखणीतून उतरलं आहे. संगीतकार नीलेश मोहरीरनं आपलं एखादं तरी गाणं संगीतबद्ध करावं, हे त्याचं स्वप्नही या टायटल साँगच्या रुपानं स्टार प्रवाहने सत्यात उतरवले आहे. स्टार प्रवाहवर २७ नोव्हेंबरपासून 'नकळत सारे घडले' ही नवी मालिका सुरू झाली. अभिनेता स्वप्नील जोशी याच्या जीसिम्स या संस्थेनं या मालिकेची निर्मिती केली आहे. स्वप्नील जोशी या मालिकेद्वारे निर्माता म्हणून छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे. हरीश दुधाडे, नुपूर परूळेकर, बालकलाकार सानवी रत्नाळीकर यांच्यासह अनेक उत्तम कलाकार या मालिकेत आहेत. या मालिकेचं टायटल साँग नीलेश उजाळ या नव्या दमाच्या गीतकारानं लिहिलं आहे. मालिकेचं टायटल साँग लिहिण्याचा नीलेशचा हा पहिलाच प्रयत्न आहे हे विशेष. नीलेश एके काळी ऑफिस बॉय म्हणून काम करत होता. गीतकार म्हणून आपला अनुभव सांगताना नीलेश म्हणाला की, 'नकळत सारे घडले' या मालिकेचं टायटल साँग लिहिण्याचा अनुभव फारच उत्तम होता. मी ज्या ऑफिसमध्ये काम करायचो, तिथले माझे सर माझ्या कवितेच्या आवडीला प्रोत्साहन द्यायचे. कवी संमेलनाला जाण्यासाठी सुटीही द्यायचे. स्टार प्रवाहच्या प्रोग्रामिंग हेड श्रावणी देवधर यांनी माझ्या काही कविता तिथंच वाचल्या होत्या. त्यांनी मला बोलावून घेतलं. माझ्यासमोर एक कथा ठेवली आणि त्या कथेवर गाणं लिहायला सांगितलं. मी ती कथा वाचली आणि गाणं लिहून दिलं. त्यांना ते गाणं आवडलं आणि 'नकळत सारे घडले' या मालिकेचं टायटल साँग म्हणून आपल्यापुढे आलं. मी खूपच नशीबवान आहे की मला स्टार प्रवाहसारखी मोठी वाहिनी संधी देत आहे. यासाठी स्टार प्रवाहचा मी ऋणी आहे,' असं नीलेशनं आवर्जून सांगितलं.