दोन विविध स्वभावाच्या व्यक्ति जेव्हा एकत्र येतात तेव्हा एक अफलातून समीकरण तयार होते, या दोघांची लव्हस्टोरी देखील धम्माल असते. स्टार प्रवाहवर या वाहिनीवरील ‘आम्ही दोघे राजा राणी’ या मालिकेतून अशाच एका गोड जोडीची लोभस प्रेमकहाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

‘पार्थ’ आणि ‘मधुरा’ हे दोन राजा राणी या मालिकेत असून ही दोघेही आपापल्या अतरंगी कुटुंबासोबत राहतात. एकत्र कुटुंबात वाढणाऱ्या या दोघांचे त्यांच्या कुटुंबावर अतोनात प्रेम आहे पण त्यांचे तऱ्हेवाईक कुटुंबिय या दोघांच्या प्रेमकहाणीत जबरदस्त तडका देणार आहेत. दोघांच्या राजाराणीच्या संसारात त्यांची कुटुंब काय करामती करतायत हे अतिशय मनोरंजक आणि तितक्याच खुमासदारपणे मांडण्यात आलं आहे. या दोघांची हटके भेट, त्या भेटीचे मैत्रीत आणि त्यानंतर प्रेमात कसे रुपांतर होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. प्रेमाची गुलाबी छटा असलेली ही रोमँटिक कॉमेडी मालिका संपूर्ण कुटुंबासह पहावी अशीच आहे.

संगीता राकेश सारंग यांच्या ‘कॅम्सक्लब’ने या मालिकेची निर्मिती केली आहे. विजय पटवर्धन, समीर चौघुले आणि अभिजित पेंढारकर मालिकेचं लेखन करत असून, संचित वर्तक दिग्दर्शन करत आहेत. मंदार कुलकर्णी, दीप्ती लेले या देखण्या गोंडस जोडी सोबत मिलिंद फाटक, विनय येडेकर, मैथिली वारंग, सुलेखा तळवलकर,शीतल शुक्ल आदी विनोदी अभिनायात मुरब्बी कलाकार यातील भूमिका साकारत आहेत.

‘विकता का उत्तर’ हा हटके गेम शो, ‘गोठ’,‘गं….सहाजणी’ आणि ‘नकुशी… तरीही हवीहवीशी’ या तीन मालिकांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे ‘आता थांबायचं नाय’ म्हणत ‘स्टार प्रवाह’ उत्तम आशय आणि निखळ मनोरंजनासाठी ‘आम्ही दोघं राजा राणी’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहे. त्यामुळे प्रेक्षकवर्गाचा आकडा वाढवण्यासाठी स्टार प्रवाह या वाहिनीने सुरु केलेल्या आणि विविध विषयांना साद घालणाऱ्या या मालिका प्रेक्षकांना कितपत भावणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.