तब्बल चार वर्षे मोठ्या पडद्यापासून दूर राहिल्यानंतर आता पुनरागमन करण्यासाठी उत्सुक असल्याची प्रतिक्रिया अभिनेता अक्षय खन्ना याने दिली. अक्षय खन्ना ‘ढिशूम’ या आगामी चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पुनरागमन करत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर देखील प्रदर्शित झाला. चित्रपटात अक्षय खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.
चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शनावेळी पत्रकारांशी बोलताना तो म्हणला की, काही वैयक्तिक कारणासाठी मी मोठ्या पडद्यापासून दूर होतो. पण आता पुनरागमनासाठी उत्सुक असून, ‘ढिशूम’ चित्रपटासोबत माझे आणखी काही चित्रपट यावर्षी प्रदर्शित होणार आहेत. हे चित्रपट प्रदर्शित होण्याची मी आतुरतेने वाट पाहत आहे, असेही तो पुढे म्हणाला.
४१ वर्षीय अक्षय खन्ना चित्रपटात ‘वाघा’ नावाची खलनायकाची भूमिका साकारत असून, तो एका भारतीय क्रिकेटपटूचे अपहरण करतो आणि त्यातून घडणारा रोमांच चित्रपटात पाहायला मिळणार आहे. चित्रपटाबाबत बोलताना तो म्हणाला की, भारत विरुद्ध पाकिस्तानच्या अंतिम सामन्याच्या ३६ तास आधी एका भारतीय क्रिकेटपटूचे अपहरण होते. माझ्यासाठी ही एकच ओळ खूप महत्त्वाची आहे आणि तिच चित्रपटाबाबत रोमांच निर्माण करणारी आहे. याशिवाय, त्याचे अपहरण देखील अतिशय अद्ययावत पद्धतीने केले गेल्याने मला ही भूमिका साकारण्यासाठी आणखी उत्सुकता निर्माण झाली.