अभिनेता इरफान खानला जगाचा निरोप घेऊन महिना लोटला आहे. पण, त्यांच्या दुःखातून त्याचे कुटुंबीय, मित्र आणि चाहते अजूनही सावरलेले नाहीत. चित्रपट दिग्दर्शक शुजित सरकारही इरफानच्या आठवणीतून अजून सावरलेला नाही. शुजितनं सरदार उधम सिंग या आपल्या नव्या चित्रपटाचं काम सुरू केलं असून, या चित्रपटाच्या निमित्तानं त्याने इरफानविषयीच्या भावना वाट मोकळी करून दिली. या सिनेमातील मुख्य भूमिका इरफाननं करावी अशी शुजितची इच्छा होती. पण, ती अपूर्णच राहिली. अमिताभ बच्चन आणि आयुषमान खुराणा यांची मुख्य भूमिका असलेला शुजित सरकार याचा गुलाबो सीताबो हा सिनेमा १२ जूनला प्रदर्शित होत आहे. या सिनेमानंतर शुजितनं सरदार उधम सिंग या सिनेमाचं काम सुरू केलं आहे. या सिनेमात विकी कोशल्य मुख्य भूमिकेत आहे. या भूमिकेसाठी शुजितची पहिली पसंत इरफान खानला होती. मात्र, त्याचा आजार बळावल्यानं इरफानऐवजी विकी कौशलची निवड करण्यात आली. सरदार उधम सिंग आणि इरफान खानविषयी बोलताना शुजित म्हणाला,"हा सिनेमा त्याच्यासाठीच होता, ज्याला सगळ्या गोष्टींपेक्षा कहाणीचं मूल्य कळत होतं. मी इरफानविषयी दररोज विचार करतो. त्याचं दृश्य अजूनही माझ्या डोळ्यासमोर तरळते. त्याच्यावर उपचार सुरू झाल्यानंतर मागील दोन वर्षाच्या काळात आम्ही जवळ आलो होतो. इरफान जाण्यापूर्वी शेवटच्या दहा दिवसात सुतापा (इरफानची पत्नी) व बाबील (इरफानचा मुलगा) यांच्याकडून माहिती घ्यायचो. त्या दिवशी सकाळी बाबीलनं मला इरफान गेल्याची बातमी कळवली. पण, आजही मला असं वाटतंय की इरफान माझ्यासोबत आहे. तो माझ्याशी बोलतोय," असं शुजित म्हणाला.