चित्रपट दिग्दर्शक करण जोहरचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत ठरलेला 'स्टूडंट ऑफ द इअर २' हा चित्रपट अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला. 'स्टूडंट ऑफ द इअर'मधून आलिया भट्ट, वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा या कलाकारांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. त्यानंतर आता या चित्रपटाच्या सीक्वलमधून करणने नव्या कलाकारांची बॉलिवूडला ओळख करुन दिली. त्याचा हा प्रयत्न काही अंशी यशस्वीही ठरला आहे. त्याच्या या नव्या बॅचमधून त्याने अनन्या पांडे आणि तारा सुतारिया या दोन नवोदित अभिनेत्रींना बॉलिवूडची ओळख करुन दिली. 'स्टू़डंट ऑफ द इअर २' या चित्रपटात एका लहान गावात राहणाऱ्या रोहन सेहगलची (टायगर श्रॉफ) कथा दाखवण्यात आली आहे. रोहनचं लहानपणापासून त्याच्या मैत्रिणीवर मृदुलावर (तारा सुतारिया) प्रेम असतं. तिच्या प्रेमापोटी तोदेखील तिच्याच कॉलेजमध्ये प्रवेश घेतो. कॉलेजमध्ये प्रवेश केल्यानंतर रोहनची भेट पोस्टर बॉय अर्थात मानव मेहरा आणि त्याची बहीण श्रेया (अनन्या पांडे) हिच्याशी होते. मात्र पहिल्याच भेटीमध्ये रोहन आणि मानवची एकमेकांशी टक्कर होते आणि खऱ्या अर्थाने या चित्रपटाला रंगतदार वळण येतं. या काळामध्ये रोहन आणि मृदुलाच्या नात्यात दुरावा आला असतो. रोहन मानवला २९ व्या वार्षिक आंतर महाविद्यालयीन डिग्निटी कप स्पर्धेत हरविण्याचे चॅलेंज करतो. याच स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्याला 'स्टुडंट ऑफ द इयर'च्या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असतं. या दरम्यान श्रेया आणि रोहनमध्ये देखील मैत्री व प्रेम निर्माण होते. मात्र मृदुलादेखील पुन्हा रोहनच्या आयुष्यात येते. त्यामुळे 'स्टुडंट ऑफ द इयर'ची ट्रॉफी आणि डिग्निटी कपसाठीच्या स्पर्धेत कोण जिंकतं आणि रोहन मृदुलाची निवड करतो की श्रेयाची हे चित्रपट पाहिल्यानंतरच प्रेक्षकांना समजणार आहे. 'स्टुडंट ऑफ द इयर २' चित्रपटाची कथा सुरुवातीला हलकी फुलकी असून अंतिम टप्प्यात गंभीर होत जाते. ही कथा कॉलेजवर आधारित असली तरी एक सीन सोडला तर कोणत्याही सीनमध्ये लेक्चर किंवा अभ्यासाचा भाग दाखविण्यात आलेला नाही. त्यामुळे प्रेक्षक कुठेतरी नाराज होताना दिसतात. मात्र टायगर श्रॉफने त्याच्या अभिनयामुळे आणि अॅक्शन सीनमुळे चाहत्यांचं काही काळ मनोरंजन केलं आहे. तर तारा आणि अनन्या यांचा हा पहिलाच चित्रपट असून त्यांनी त्यांच्या भूमिकेला पुरेपूर न्याय दिला आहे. एकंदरीतच पुनीत मल्होत्रा दिग्दर्शित आणि करण जोहर निर्मित 'स्टूडंट ऑफ द इअर २' चाहत्यांच्या मनाला भावला आहे. चित्रपटात प्रत्येक सीनला साजेसे असे संगीत आणि गाण्यांचा यात समावेश करण्यास दिग्दर्शक- निर्मात्यांना चांगलेच यश आल्याचं पाहायला मिळत आहे. इतकंच नाही तर चित्रपटाचं नेपथ्य आणि चित्रपटाचा सेटही उत्तमरित्या उभारण्यात आला आहे, त्यामुळे हा चित्रपट काही अंशी प्रेक्षकांच्या पसंतीत उतरेल असं एकंदरीतच दिसून येत आहे. तीन स्टार