संगीत हा भारतीय चित्रपटाचा प्राण आहे. त्यामुळेच पिढी कोणतीही असो, चित्रपटांतील संगीताला कधीच मरण आले नाही. संगीत एवढे लोकप्रिय असूनही भारतात अजून संगीताचे आणि संगीत तयार करण्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देणारी संस्था आपल्याक डे नाही, याबद्दल दिग्दर्शक सुभाष घई खंत व्यक्त करतात. त्यामुळेच त्यांच्या ‘व्हिसलिंग वूड इंटरनॅशनल इन्स्टिटय़ूट’मध्ये संगीत तयार करण्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देणाऱ्या ‘म्युझिक स्कूल’ची सुरुवात करण्यात आली आहे. या वेळी बोलताना संगीत क्षेत्रामध्ये नव्याने येणाऱ्या तंत्रज्ञानाची गरज प्रत्येक काळात होतीच. पण, या तंत्रज्ञानाच्या अतिआहारी गेल्याने मात्र कलाकाराची कला मरत असल्याचे ते सांगतात.
आज चित्रपटक्षेत्र दिवसागणिक वाढत आहे आणि त्यासोबतच संगीतक्षेत्रही विस्तारत आहे. या विस्तारत जाणाऱ्या क्षेत्रामध्ये स्वत:चे स्थान टिकवून ठेवायचे असेल तर नव्या संगीतकारांकडे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण असण्याची गरज ते व्यक्त करतात.
 हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये एक काळ होता जेव्हा गायक आणि वाद्यवृंद चित्रीकरणाच्या ठिकाणी जात असत. गाणं आणि नायक-नायिकाचा नाच एकत्रच चित्रित होत असे. पण, आता आद्ययावत तंत्रज्ञानाने मात्र सर्वच चित्र पालटलं आहे. संगीतकाराचं काम अधिक सोपं करण्याचं काम हे तंत्रज्ञान करत असल्याचं ते सांगतात. पण, म्हणून त्यांच्या आहारी जाणंही योग्य नाही. त्यामुळे मूळ कला निघून जाते आणि उचलेगिरीची सवय लागत असल्याचं ते सांगतात. त्यामुळे प्रत्येकाला आपल्या मर्यादा स्वत: आखून घेणं महत्त्वाचं असतं, हेही ते मान्य करतात.
 ‘आपल्याकडे लोककला, सुफी संगीताची मोठी परंपरा आहे. त्यामुळे संगीताच्या बाबतीत इतर कुठे जाण्याची गरजच आजच्या पिढीला भासत नाही. ते त्यांच्या मुळाकडे परतण्याचा अधिकाधिक प्रयत्न करताना दिसत आहेत’, असं ते सांगतात.