हल्ली बॉलिवूडमधील चित्रपटांमधून विविध विषय हाताळले जातात. देशभरातील छोटी-छोटी शहरे, त्यांची संस्कृती, त्यांच्या गोष्टी दाखवणाऱ्या दिग्दर्शकांची आणि त्यांच्या चित्रपटांची एकच लाट मध्यंतरी आली होती. यातीलच एक चित्रपट म्हणजे 'सुई धागा'. छोटय़ा गावात राहणारा मौजी (वरुण धवन) आणि त्याची पत्नी ममता (अनुष्का शर्मा) यांची ही कथा आहे. नुकतीच या चित्रपटाची 'शांघाय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात' निवड करण्यात आली आहे. या चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक व निर्माते यांना एकत्र आणले होते. निर्माते मनीष शर्मा म्हणाले की, "भारतातील प्रादेशिक कलाकारांमधील उद्योजकतेला प्रोत्साहन देणारा हा चित्रपट आहे. 'शांघाय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा'चे व्यासपीठ मानाचे आहे." या चित्रपटातील कलाकारांनाही या बातमीने सुखद धक्का दिला आहे. आदर मिळवण्यासाठी झटणाऱ्या सामान्य माणसाची ही कथा आहे. "या महोत्सवात 'सुई धागा'ला सकारात्मक प्रतिसाद मिळावा अशी माझी इच्छा आहे. आमचा 'मेड इन इंडिया' चित्रपट त्यांना नक्कीच आवडेल." असे वरूण धवन म्हणाला. "जगभरातील प्रेक्षकांना आनंद देण्याची या चित्रपटाची क्षमता आहे. 'कॉम्पिटिशन कॅटगरी'मध्ये आमच्या चित्रपटाची निवड झाली आहे याचा आनंद आहे." असं अनुष्का शर्मा म्हणाली. 'शांघाय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव -द बेल्ट अँड रोड फिल्म वीक'ची सुरुवात शनिवार २२ जूनपासून होणार आहे.