कोणत्याही कलाकारासाठी चाहत्यांकडून मिळणारं भरभरुन प्रेम हीच कामाची पोचपावती असते. चाहत्यांच्या याच प्रेमामुळे नवं काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच काहीसा अनुभव सांगितला आहे तो अभिनेत्री गिरीजा प्रभूने. गिरीजा सध्या स्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत गौरीची भूमिका साकारते आहे. या मालिकेतील जयदीप – गौरीच्या जोडीला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. त्याचीच पोचपावती म्हणून गौरीच्या एका खास चाहत्याने गौरीला मालिकेतील फोटो आणि स्वलिखित एक पत्र भेट म्हणून दिलं.

सोशल मीडियाच्या काळात पत्र लिहिणं तसं मागे पडत चाललं आहे. चाहते कलाकारांना सोशल मीडियावरुनच आपली प्रतिक्रिया कळवत असतात. मात्र या चाहत्याने गौरी आणि मालिकेचं कौतुक करणारं पत्र पाठवत मालिकेविषयी असणारं प्रेम व्यक्त केलं. या अनोख्या गिफ्टने गौरीही भारावून गेली. प्रेक्षकांचं हे प्रेम असंच राहो अशी भावना तिने व्यक्त केली.

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत सध्या गौरीने घर सोडलं आहे. गौरीला शोधण्याचे बरेच प्रयत्नही सुरु आहेत. गौरीचे चाहतेही सध्या तिला मालिकेत मिस करत आहेत. तिने लवकरात लवकर परत यावं अशी मागणीही करत आहेत. या पत्रातही तसा आवर्जून उल्लेख करण्यात आला आहे.