स्टार प्रवाह वाहिनीवर १७ ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेच्या प्रोमोजनी सध्या प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. नुकतंच या मालिकेचं शीर्षकगीत संगीतबद्ध करण्यात आलं. स्टार प्रवाह प्रस्तुत आणि कोठारे व्हिजन्सची निर्मीती असलेल्या या मालिकेचं शीर्षकगीत कार्तिकी गायकवाडच्या आवाजात स्वरबद्ध करण्यात आलं आहे. गीतकार श्रीरंग गोडबोले यांनी हे शीर्षकगीत लिहिलं असून पंकज पडघण यांनी हे शीर्षकगीत संगीतबद्ध केलं आहे.
या गाण्याच्या अनुभवाविषयी सांगताना कार्तिकी म्हणाली, ‘मी याआधी बऱ्याच अल्बम्स, नाटक आणि सिनेमांसाठी गाणी गायली आहेत मात्र शीर्षकगीत गाण्याची ही माझी पहिलीच वेळ. या संधी बद्दल स्टार प्रवाह आणि कोठारे व्हिजन्सचे आभार. सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेचं शीर्षकगीत अतिशय सुंदर आहे अगदी पुन्हा पुन्हा गुणगुणावं असं. गाणं ऐकायला जितकं सुंदर आहे तितकंच ते गाण्यासाठी कठीण होतं. शीर्षकगीताच्या निमित्ताने या मालिकेचा एक भाग होता आला याचा आनंद आहे.’
१७ ऑगस्टपासून रात्री ९.३० वाजता ही मालिका आपल्या भेटीला येणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 3, 2020 5:19 pm