कलर्स मराठीवरील सुखाच्या सरींनी हे मन बावरे ही मालिका सध्या एका रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. सिद्धार्थने अनुसोबत ओळख झाल्यापासून त्याची खरी ओळख लपवली असून तो हरी या नावानेच तिच्या समोर वावरतोय. ही गोष्ट दुर्गाला समजली आहे. दुर्गाला सुरुवातीपासूनच सिद्धार्थ आणि अनुची मैत्री आवडत नसल्यामुळे ती सिद्धार्थच्या या खोटेपणाचा आधार घेत या दोघांच्या मैत्रीमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करते. विशेष म्हणजे दुर्गाची ही खेळी यशस्वीही ठरली. त्यामुळे अनुने सिद्धार्थशी अबोला धरला आहे.

दुर्गाने केलेला हा सगळा गुंता सिध्दार्थ कसा सोडवेल ? अनुची साथ पुन्हा सिद्धार्थला मिळेल ? अनु सिध्दार्थला समजून घेईल का ? हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे.

विशूच्या वाढदिवसाच्या दिवशी दुर्गा सिद्धार्थच सत्य अनुसमोर आणते. अनुला खोट्याची चीड असल्याने हे सत्य तिच्यासमोर येताच तिचा सिद्धार्थवरचा विश्वास पूर्णपणे उडून जातो. अनु आणि सिद्धार्थमध्ये दुरावा आणण्यात दुर्गा यशस्वी होते. परंतु दुर्गाने हे सत्य अनुला सांगितले आणि तिला बरच काही ऐकवून दाखविलं हे सिध्दार्थला कळताच सिद्धार्थ दुर्गाशी बोलणे बंद करतो. आता मालिकेमध्ये पुढे काय होईल ? अनुची मैत्री आणि तुटलेला विश्वास सिद्धार्थ पुन्हा मिळवू शकेल का ? अश्या अनेक प्रश्नांची उत्तर प्रेक्षकांना लवकरच मिळणार आहेत.