कलर्स मराठी वाहिनीवरील 'सुखाच्या सरींनी हे मन बावरे' मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या मालिकेद्वारे शशांक आणि मृणाल पहिल्यांदाच एकत्र प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत. ही जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. इतकेच नसून या मालिकेमधून शर्मिष्ठा आणि शशांक केतकर हेदेखील पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीस आले आणि प्रेक्षकांना या दोघांमधील बहीण भावाचं नातंदेखील खूप आवडत आहे. सिड आणि संयु यांच्यातील छोटी-मोठी भांडणं, सिडचे संयुला समजावणे, त्यांची धम्माल मस्ती प्रेक्षकांना आवडू लागली आहे. पडद्यावरच नसून पडद्यामागे देखील यांची बरीच धमाल मस्ती सुरु असते. मालिकेद्वारे चोवीस तासातला बराचसा वेळ हे कलाकार एकत्र राहतात. त्यामुळे तुम्ही एकमेकांना खूप छान ओळखू लागता आणि त्यातून काही सुंदर नाती तयार होतात जी आयुष्यभर तशीच राहतात. मैत्रीबाबत शशांक केतकर म्हणतो, “शर्मिष्ठा आणि माझी मैत्री या मालिकेमुळे झाली. बिग बॉस मराठीमुळे मला शर्मिष्ठा कळली. ती खूप उत्साही आणि बिनधास्त मुलगी आहे. ज्याच्यावर जीव लावते त्याच्यावर पूर्ण जीव लावते आणि एक मात्र नक्की मी तिच्या आणि ती माझ्या आवडत्या माणसांच्या यादीमध्ये आता हळूहळू येत चाललो आहे.'' वाचा : 'नशीबवान' भाऊंची भिरभिरणारी नजर प्रदर्शित यावेळी शशांकने सेटवरचा एक गमतीशीर किस्सासुद्धा सांगितला, 'शर्मिष्ठाला ललितला बोलवायचं होतं आणि तिने त्याला चार वेळा सिद्धार्थ याच नावाने हाक मारत होती. यावरूनच आमची बॉन्डींग किती चांगली झाली हे स्पष्ट होतंय.' शर्मिष्ठा म्हणाली, “शशांक बरोबर काम करायला खूप मज्जा येते. याआधी मी शशांकला नावाने ओळखत होती, पण मालिकेद्वारे एकमेकांना ओळखायची संधी मिळाली. शशांक एक उत्तम अभिनेता आहे, सीन परफॉर्म करताना त्याची खूप मदत होते. त्याची दुसरी बाजू खूप कौतुकास्पद आहे आणि ती म्हणजे त्याचे स्वत:चे हॉटेल आहे जे तो उत्तमरीत्या सांभाळतो आणि सेटवर देखील तो त्याने तयार केलेल्या बऱ्याच गोष्टी आणतो ज्या अप्रतिम असतात.”