‘हेरा फेरी’ हा बॉलिवूड इतिहासातील आजवरच्या सर्वोत्कृष्ट विनोदीपटांपैकी एक म्हणून ओळखला जातो. या चित्रपटात अभिनेता परेश रावल, अक्षय कुमार आणि सुनिल शेट्टी यांनी अफलातुन अभिनयाचे प्रदर्शन केले आहे. २००० मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला अलिकडेच तब्बल २० वर्ष पूर्ण झाली. या निमित्ताने अभिनेता सुनिल शेट्टीने चित्रपटातील काही गंमतीशीर अनुभव प्रेक्षकांसोबत शेअर केले आहेत.

आयएमडीबीला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, “हेरा फेरी या चित्रपटात अनेक नामवंत कलाकारांनी काम केले होते. मात्र कुठल्याच कलाकाराला दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी सुपरस्टार सारखी वागणूक दिली नाही. चित्रीकरणाच्या वेळी ते आम्हाला चक्क वर्तमानपत्रावर झोपायला सांगायचे. आमच्या चेहऱ्यावर कधीही मेकअप करण्यात आला नव्हता. जुने फाटलेले कपडे आम्ही परिधान करत होतो. अक्षयने तर कित्येक दिवस भोक पडलेली बनियान घातली होती. बाहेर गेलो तर आम्हाला कोणी ओळखणारही नाही अशा गेटअपमध्ये आम्ही असायचो. परंतु हेच चित्रपटाचे खरे यश होते. संपूर्ण चित्रपट तयार झाल्यावर आम्हाला लक्षात आले की प्रियदर्शन आमच्यासोबत असे का वागत होते. चित्रपटात आम्ही सर्वसामान्य लोकांचे प्रतिनिधित्व करत होतो. त्यासाठीच दिग्दर्शकाची ही खटपट सुरु होती.” असा अनुभव सुनिलने सांगितला.

हेरा फेरी हा एक ब्लॉकबस्टर चित्रपट होता. या चित्रपटात अक्षय, सुनिल आणि परेल रावल यांच्यासोबतच गुलशन ग्रोवर, ओम पुरी, असरानी, तब्बू, मुकेश खन्ना यांसारख्या अनेक नामवंत कलाकारांनी काम केले होते. या चित्रपटातील विनोद आजही प्रेक्षकांना तितक्याच उत्तम प्रकारे खळखळवून हसवतात.