विनोदवीर सुनील ग्रोवर आणि कपिल शर्मा यांच्यात झालेल्या वादामुळे बऱ्याच चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर सुनील ग्रोवरने ‘द कपिल शर्मा शो’ सोडण्याचा निर्णय घेतला. सुनीलने कपिलचा शो सोडल्यानंतर त्याचा परिणाम टीआरपीवर झालाच. पण, त्यासोबतच कपिलच्या कार्यक्रमाचे अस्तित्वही धोक्यात आले. कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर यांच्या विनोदाचे अफलातून टायमिंग आणि प्रेक्षकांचे त्यांच्यावर असणारे प्रेम पाहता सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनीच सुनीलला या शोमध्ये परत येण्याची विनंती केली. पण, सुनीलवर मात्र त्याचा काहीही परिणाम झाला नाही.

राजू श्रीवास्तव, नवज्योत सिंग सिद्धू आणि एहसान कुरेशी यांनी सुनीलची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यामागोमागच आता विनोदवीर सुनील पालने त्याच्या फेसबुक अकाऊंटवरुन एक व्हिडिओ पोस्ट करत सुनीलला ‘द कपिल शर्मा शो’मध्ये परतण्याची विनंती केली आहे. ‘तू अत्यंत चांगला कलाकार आहेस. आणि प्रेक्षक तुझ्या याच कलेची कदर करतात. पण, एका कलाकाराची कला तेव्हाच इतरांपर्यंत पोहोचते आणि खुलून येते जेव्हा तिला योग्य ते व्यासपीठ मिळते. तू आणि कपिलने मिळूनच आतापर्यंतचे यश संपादन केले आहे. तुम्ही दोघंही या कार्यक्रमरुपी गाडयाची दोन चाकं आहात.’ असं म्हणत सुनीलने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

या व्हिडिओमध्ये सुनील पालने कपिलच्या चुकांकडेही सर्वांचे लक्ष वेधले आहे. ‘मला माहिती आहे की, कपिलचीही यात चूक आहे. पण, एखाद्या कुटुंबाप्रमाणे असलेले तुमचे संबंध पाहता त्यात वाद होणं स्वाभाविक आहे. त्यामुळे तू त्याला (कपिलला) माफ कर’, असे सुनील या व्हिडिओमध्ये म्हणाला आहे. सुनील पालने पोस्ट केलेल्या या व्हिडिओचा सुनील ग्रोवरवर काय परिणाम होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सुनील ग्रोवर ‘द कपिल शर्मा शो’मध्ये ‘रिंकू भाभी’ आणि ‘डॉ. मशहूर गुलाटी’ या विनोदी व्यक्तिरेखा साकारत होता. कपिल शर्मा शो मधील त्याची उपस्थितीच या कार्यक्रमाची यूएसपी असल्याचे मत प्रेक्षकांनी मांडले आहे. पण, सध्या सुनील या कार्यक्रमाचा भाग नसल्यामुळे कपिल शर्मा शोच्या टीआरपीवर त्याचे थेट पडसाद उमटत आहेत.