आपल्या सुरेल आवाजानं भावगीतांसह मराठी आणि हिंदी चित्रपटातील गाण्यांना साज चढवणाऱ्या सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. मेघा रे मेघा रे’, ‘चप्पा चप्पा चरखा चले’, ‘ए जिंदगी’ यांसारख्या अनेक सुपरहिट गाण्यांमुळे सुरेश वाडकरांनी चाहत्यांच्या मनावर त्यांच्या आवाजाची छाप सोडली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारनं पद्म पुरस्काराची घोषणा केली. त्यात सुरेश वाडकर यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. कोण आहेत सुरेश वाडकर? मराठीसह हिंदी, इंग्रजी, उर्दू, पंजाबी या भाषांची उत्तम जाण असणारे सुरेश वाडकर म्हणजे एक अष्टपैलू व सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्त्व आहे. त्यांचा जन्म सात ऑगस्ट १९५५ साली कोल्हापुरात झाला होता. लहानपणापासूनच त्यांना गाण्याची आवड होती. त्यांना १९७८ साली प्रदर्शित झालेल्या ‘गमन’ या चित्रपटात त्यांना पहिल्यांदा गाण्याची संधी मिळाली होती. या चित्रपटात त्यांनी ‘सीने में जलन आँखों में तूफान सा क्यों है’ हे गाणं गायले होते. या गाण्यामुळे सुरेश वाडकर लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचले. त्यानंतर त्यांनी आपल्या संगीत कारकिर्दीत शेकडो गाणी गायली आहेत. गेल्या काही काळात संगीत क्षेत्रात अनेक नवे कलाकार आले. परंतु आजही त्यांनी गायलेली 'ओंकार स्वरुपा सदगुरु समर्था', 'तू सप्तसूर माझे', 'सुरमयी अखियों मे', 'ऐ जिंदगी गले लगा ले', 'सपने में मिलती है' यांसारखी अनेक गाणी रसिकांच्या ओठांवर खेळतात. आजही त्यांनी गायलेल्या भक्ती गीतांपासून अनेकांच्या दिवसाची सुरुवात होते.