भारतीय हवाई दलानं मंगळवारी पहाटे पाकिस्तानातील जैश – ए- महम्मदच्या तळावर हल्ले करून ते उद्ध्वस्त केले. पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ४१ जवान जैश – ए- महम्मदच्या आत्मघातकी हल्ल्यात शहीद झाले. या हल्ल्यानंतर अवघ्या १२ दिवसांत वायूदलानं कारवाई करत दहशतवाद्यांची तळं उद्ध्वस्त केली. या दमदार कारवाईचे देशवासियांनी जल्लोषात स्वागत केले.

देशवासियांकडून हवाई दलावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. मराठी कलाकरांनी देखील ट्विट करत हवाई दलाचं कौतुक केलं आहे. अभिनेता सुबोध भावे, सिद्धार्थ चांदेकर, रितेश देखमुख, सोनाली कुलकर्णी, प्रिया बापट सिद्धार्थ जाधव, अमृता खानविलकर यांसारख्या कलाकारांनी हवाई दलाचं कौतुक करत त्यांना सलाम केला आहे.

‘अभिमान. हा एकच शब्द माझ्या देशासाठी पुरेसा आहे. माझा देश सहनशील आहे, पण शांत बसणारा नाहीये. माझ्या देशात वाद विवाद, भेदभाव होत असेल, पण अतिरेक्यांच्या विरोधात माझा देश एक असतो. तेव्हा कुठलाही धर्म, जात, पंथ आड येत नाही’ असं म्हणत अभिनेता सिद्धार्थ चांदेकर यानं सैन्याला सलाम केला आहे.

‘भारतीय हवाई दलाला मानाचा मुजरा, त्यांनी त्यांचं काम चोख बजावले. आता आपली पाळी.. किमान रहदारीचे नियम पाळून आपल्याच देशातील निष्पाप बांधवांचे प्राण वाचवू.’ असं ट्विट सुबोध भावेनं केलं आहे.

पण त्याचबरोबर रितेश देखमुख, सिद्धार्थ जाधव, स्वप्नील जोशी या कलाकारांनी ट्विट करत हवाई दलाला मानाचा मुजरा केला आहे.

 

अभिनेत्री अमृता खानविलकर, प्रिया बापट, सोनाली कुलकर्णी, तेजस्वीनी पंडित यांनी हवाई दलाचं कौतुक केलं आहे.

 

हवाई दलाच्या मिराज विमानांनी अवघ्या दीड मिनिटांत ही कारवाई पार पाडली. यात ३०० हून अधिक दहशतवादी ठार झाल्याचं म्हटलं जात आहे