पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानविरोधात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत सुमारे २०० ते ३०० दहशतवादी ठार झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. भारतीय वायूसेनेच्या मिराज २००० या लढाऊ विमानांनी पहाटे साडेतीनच्या सुमारास पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर बॉम्बनं हल्ला केला आहे. या सर्जिकल स्ट्राइक्सचं देशभरातून कौतुक होत आहे.

बॉलिवूडनंही भारतीय वायूसेनेचं कौतुक केलं आहे. पुलवामा हल्ल्यानंतर बॉलिवूडमध्येही संतापाची लाट उसळली होती. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर या हल्ल्याचा कडाडून निषेध केला होता. काहींना पाकिस्तानमध्ये आपला चित्रपट प्रदर्शित न करण्याचाही निर्णय घेतला होता. तर अक्षय कुमार, अमिताभ बच्चन यांसारख्या सेलिब्रिटींनी आर्थिक मदत केली होती.

भारतानं अवघ्या महिन्या दोन आठवड्यांच्या आत हल्ल्याचा बदला घेतला. त्यामुळे बॉलिवूडमधल्या अनेक सेलिब्रिटींनी ट्विट करत भारतीय वायूसेनेचं कौतुक केलं आहे. तसेच पंतप्रधान मोदींचेही आभार ट्विटवर मानले आहे.  पुलवामामधल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करणाऱ्या अजयनंही वायुसेनेचं कौतुक केलं आहे.

तर अभिनेता विवेक ओबेरॉय, अभिषेक बच्चन, अनुपम खेर, परेश रावल यांनीदेखील ट्विट करत भारतीय वायुसेनेचं आणि मोदींचं कौतुक केलं आहे. ही खऱ्या अर्थानं चांगली सकाळ होती अशा शब्दात परेश रावल यांनी आनंद व्यक्त केला आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर बॉलिवूडनं पाकिस्तानी कलाकरांवर घातलेल्या बंदीचं समर्थन केलं होतं.