अभिनेता सुशांत सिंह राजपुतच्या मृत्यूवरुन बॉलिवूडमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा खेळ सुरु झाला आहे. यामध्ये अभिनेत्री कंगना रनौत सर्वाधिक चर्चेत आहे. बॉलिवूड कलाकारांची नावं घेऊन ती आरोप करत आहे. दरम्यान सुशांतच्या मृत्यूप्रकरणी सुरु असलेल्या वादात आता तिने थेट राज्याचे पर्यावरण मंत्री व शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांना ओढलं आहे. करण जोहर आदित्य ठाकरे यांचा मित्र असल्यामुळे त्याला अद्याप चौकशीसाठी बोलावण्यात आलेलं नाही, असा खळबळजनक आरोप तिने केला आहे.

अवश्य पाहा – “सुशांतच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करा”; मोदींनी दिलं भाजपा खासदाराच्या पत्राला उत्तर

कंगनाने आपल्या टीमच्या ट्विटर हँडलवरुन जोरदार आरोप केले आहेत. “मुंबई पोलीस बेधकडकपणे पक्षपात करत आहेत. मला चौकशीसाठी बोलावण्यात आलं. पण करण जोहरची चौकशी अद्याप झालेली नाही. त्याऐवजी पोलिसांनी त्याच्या मॅनेजरला समन्स पाठवलं. असं का? कारण साहेबांना त्रास होऊ नये म्हणून का? अशा आशयाचं ट्विट करुन कंगनाने आपला संताप व्यक्त केला.

अवश्य पाहा – लष्करातील नोकरी सोडून या अभिनेत्रीनं केलं बॉलिवूडमध्ये करिअर

त्यानंतर तिने आणखी एक ट्विट केलं या ट्विटमध्ये तिने थेट आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. “करण जोहर हा आदित्य ठाकरे यांचा खास मित्र असल्यामुळे त्याला चौकशीसाठी बोलावण्यात आलं नाही. त्याऐवजी त्याच्या मॅनेजरची चौकशी झाली. सुशांतच्या हत्येची थट्टा करणं थांबवा.” अशा आशयाचं ट्विट तिने केलं. सुशांतच्या मृत्यूप्रकरणी सध्या मुंबई पोलिसांवर संशय व्यक्त केला जात आहे. ही केस पोलिसांऐवजी CBI कडे सोपवण्यात यावी अशीही विनंती सध्या जोर धरु लागली आहे. या पार्श्वभूमीवर कंगनाचे हे ट्विट सध्या चर्चेत आहेत. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.