जवळपास दोन वर्षांपूर्वी बॉलिवूडमध्ये MeToo मोहिमेने वादळ सुरु झाले होते. अभिनेत्री तनूश्री दत्ताने बॉलिवूडमध्ये सुरु केलेल्या या मोहिमेने महिलांवर झालेल्या अन्यायाला वाच्या फोडली. अनेक अभिनेत्रींना तनूश्रीला पाठिंबा देत त्यांच्यावर झालेल्या अन्याया विरुद्ध आवाज उठवला. यामध्ये कलाविश्वातील अनेक दिग्गज कलाकारांची नावे समोर आली होती. तसेच दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचे नाव घेण्यात आले होते. ‘दिल बेचारा’ चित्रपटातील सुशांतची सहकलाकार संजना संघीसोबत त्याने गैरवर्तन केल्याचे अनेकांनी म्हटले होते. पण त्यावर संजनाने वक्तव्य करत सर्व चर्चांना पूर्णविराम लावला. आता सुशांतचा मित्र कुशल जवेरीने त्यावेळी सुशांतला मी तणावात असल्याचे पाहिले होते असा खुलासा केला आहे.

नुकताच कुशलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्याने ‘मी सुशांतसोबत जुलै २०१८ पासून ते फेब्रुवारी २०१९पर्यंत राहत होतो. मी त्याला ऑक्टोबर २०१८मध्ये सर्वात जास्त त्रासात पाहिले होते. कारण मीडियाने कोणताही पुरावा नसताना त्याच्यावर निशाणा साधला होता. आम्ही संजना संघीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण ती अमेरिकेला गेली असल्यामुळे तिने यावर वक्तव्य केले नव्हते’ असे म्हटले.

‘सुशांतकडे पुरावे नसल्यामुळे तो या आरोपांवर बोलू शकत नव्हता. मला आजही आठवतं त्याच्यावर लावण्यात आलेल्या मीटू आरोपांमुळे तो चार दिवस झोपला नव्हता. तो संजनाने हे आरोप खोटे असल्याचे सांगण्याची वाट पाहात होता. पाचव्या दिवशी संजनाने हे आरोप खोटे असल्याचे सांगितले’ असे कुशलने पुढे म्हटले आहे.

या संदर्भात संजनाने काही दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीला देखील मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने “सुशांतने माझ्यासोबत गैरवर्तन केले अशी माहिती सगळीकडे पसरली होती, त्यावेळी सुशांतला खूप त्रास झाला होता. केवळ त्यालाच नाही तर मला सुद्धा या गोष्टीचा प्रचंड मनस्ताप झाला होता. कारण त्यावेळी सत्य काय आहे हे फक्त आम्हा दोघांनाच माहित होते. आमच्यातली मैत्री कशी आहे हे देखील केवळ आम्हालाच माहित होते. त्या मैत्रीचे महत्त्व आम्हाला माहित होते. परंतु,आम्ही सेटवर गेल्यावर रोज असे १-२ आर्टिकल्स यासंदर्भात यायचे” असे म्हटले होते.

“सुशांत आणि माझ्याविषयी रोज नवनवीन चर्चा रंगत होती. परंतु, आम्ही कधीच त्याच्याकडे लक्ष दिले नाही. आमची मैत्री कायम ठेवली आणि त्याच्यावर जे आरोप करण्यात आले होते, तसे आमच्यात काहीच झाले नव्हते. माहित नाही पण अशा गोष्टींची चर्चा का होऊ लागली आणि त्याच्यावर आरोप करण्यात आले. आम्ही सतत हाच विचार करायचो की लोकांना कसे समजवायचे की आमच्यात सगळं ठीक आहे. या सगळ्या अफवा आहेत. त्यावेळी एक वेगळीच परिस्थिती आमच्यासमोर निर्माण झाली होती” असे संजना पुढे म्हणाली होती.