गीतलेखन, दिग्दर्शन, अभिनय, गायन अशी मुशाफिरी करणारे स्वानंद किरकिरे यांनी युथ या आगामी मराठी चित्रपटासाठी भारुड गायलं आहे. ‘पाणी हरवलं, कोणी ते चोरलं’ असे या भारुडाचे बोल असून, गीतकार विशाल-जगदीश यांनी हे भारुड लिहिलं आहे, आणि संगीतही विशाल-जगदीश यांचंच आहे. पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस भीषण होत चालला आहे. अनेकांना मात्र त्याची जाणीवही नसते. या भारुडाच्या माध्यमातून त्यांना ती जाणीव करून देण्याचा प्रयत्न होत आहे, त्यामुळे माझ्यासाठीसुद्धा हा अतिशय वेगळा अनुभव आहे, असं स्वानंद किरकिरे यांनी सांगितलं. भारुड हा कलाप्रकार आता फारसा पहायला मिळत नाही. मराठी चित्रपटांतही त्याचा अपवादानेच समावेश झाला आहे. एक महत्त्वाचा सामजिक प्रश्न भारुडाच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडता येईल व लोकांपर्यंत पोहचवता येईल असा विश्वास दिग्दर्शक राकेश कुडाळकर यांनी व्यक्त केला. व्हिक्टरी फिल्म्स प्रस्तुत, सुंदर सेतुरामन निर्मित युथ या आगामी चित्रपटात तरुणाईचा सळसळता उत्साह, उत्स्फूर्तता पाहता येणार आहे. दिवसागणीक अधिकाधिक प्रगत होणार जग आपण सारेच अनुभवतोय. त्यात असणारा तरूणांचा सहभाग हा सुद्धा खूप मोलाची कामगिरी बजावतोय. तरुणाईचा बदलता दृष्टीकोन युथ सिनेमामधून पहाता येणार आहे. नेहा महाजन, अक्षय वाघमारे, मीरा जोशी, अक्षय म्हात्रे, केतकी कुलकर्णी, शशांक जाधव या नव्या दमाच्या कलाकारांसोबत विक्रम गोखले व सतीश पुळेकर या मातब्बर कलाकारांच्या भूमिका ही चित्रपटात आहेत.