नवनवीन मालिका आणि त्यांचं दर्जेदार सादरीकरण याच्या माध्यमातून ‘स्टार प्रवाह’ने नेहमीच प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. असाच एक वेगळा विषय असलेली मालिका ‘जिवलगा’ लवकरच स्टार प्रवाहवर सुरु होतेय. या मालिकेमध्ये अभिनेता स्वप्नील जोशी आणि ‘हँडसम हंक’ सिद्धार्थ चांदेकर हे दोघे अनुक्रमे सात आणि नऊ वर्षांनी छोट्या पडद्यावर झळकणार आहेत. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत अभिनेत्री अमृता खानविलकर आणि मधुरा देशपांडे या अभिनेत्रीही स्क्रीन शेअर करणार आहेत. त्यामुळे या मालिकेविषयी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. मात्र आता प्रेक्षकांची उत्सुकता लवकरच शमणार आहे. कारण ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘स्टार प्रवाह’ वरील बहुचर्चित आगामी मालिका ‘जिवलगा’ ही येत्या २२ एप्रिलपासून सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता स्टार प्रवाहवर सुरू होणार आहे. आघाडीचे अभिनेते स्वप्नील जोशी व सिद्धार्थ चांदेकर हे बऱ्याच वर्षानंतर छोट्या पडद्यावर पुनरागम करत आहेत. तसेच हिंदी आणि मराठी पडदा गाजवणारी अमृता खानविलकर पहिल्यांदाच दैनंदिन मालिकेमध्ये अभिनय करताना दिसणार आहे. त्यांच्याबरोबर मधुरा देशपांडे ही गुणी अभिनेत्री या मालिकेत बघायला मिळणार आहे. “जो डोळे बंद केल्यावरही दिसतो, तो जिवलगा.. ज्याच्यामुळे आपण आहोत, तो जिवलगा..” अशा आशयाची ही प्रेमकथा असून नुकतेच या मालिकेचे शीर्षक गीत सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आणि प्रेक्षकांनी देखील याला भरभरून दाद दिली आहे. ही मालिका एक प्रकारची प्रेक्षकांसाठी मेजवानी ठरेल यात काही शंका नाही. ‘जिवलगा’मध्ये नातेसंबंधांचे अनेक पैलू उलगडत गेलेले प्रेक्षकांना पाहायला मिळतील. मानवी स्वभाव आणि त्यात दाखविलेली प्रगल्भता व विचार करण्याची पद्धत यांची एक वेगळी शैली या कथेतून पुढे येणार आहे. बऱ्याचदा आपली नाती समजून घेण्याची आणि त्यांचे मूल्यमापन करण्याची पद्धत चुकते. आपल्या अवतीभवती असलेल्या माणसांबद्दलचे आपले अंदाज चुकतात. याचा गोष्टींवर ही कथा प्रकाश टाकते. प्रेमामध्ये काय ताकद असते, हेसुद्धा या कथेतून अधोरेखित होते. त्यामुळे ही कथा प्रत्येक घरातील प्रेक्षकाला आपलीशी वाटेल. डॉ. चंद्रशेखर फणसळकरांच्या गोष्टीपासून प्रेरणा घेतलेली ही मालिका आहे. तर मालिकेची संकल्पना स्टार प्रवाहचे कॉन्टेन्ट अँड प्रोग्रामिंग विभागाचे प्रमुख सतीश राजवाडे यांची आहे. विद्याधर पाठारे यांनी या मालिकेची निर्मिती केली असून पराग कुलकर्णी यांनी या मालिकेचे लेखन केले आहे. ही मालिका उमेश नामजोशी हे दिग्दर्शित करत आहे. नवनवीन मालिका आणि त्यांचं दर्जेदार सादरीकरण याच्या माध्यमातून ‘स्टार प्रवाह’ने नेहमीच प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. असाच एक वेगळा विषय असलेली ‘जिवलगा’ या मालिकेच्या निमित्ताने मराठी टेलिव्हिजनच्या जगतात एक महत्वाचं पाऊल उचलण्यात येत आहे.